अजित पवारांच्या बंडामागे आपला हात नसल्याचे स्पष्ट
कराड (प्रतिनिधी)- राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडीचेच सरकार येईल याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नसून, सरकार बनवण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आघाडीकडे असल्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्याबंडाबाबत आपल्याला काही माहीत नसून, त्यांच्या बंडामागे आपला हात नाही, असे स्पष्ट करत केंद्र सरकारवर त्यांनी टीकास्त्र सोडले.
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार यांनी सोमवारी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केले. यानंतर सौ. वेणूताई चव्हाण स्मारकात यशवंतराव चव्हाण समितीची आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ‘मी गेली पन्नास ते बावन्न वर्षांपासून राजकारणात आहे. सध्या सुरू असलेले असे बरेच प्रसंग माझ्या आयुष्यात येऊन गेले आहेत. त्यामुळे सध्याच्या या घडामोडींचे विशेष काही वाटत नाही. अशी संकटे येतात, त्यातून मार्ग निघतो. अशा काळात राज्यातील सर्वसामान्य माणूस माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो, असा माझा अनुभव आहे.” जोपर्यंत तरुणपिढी, सर्वसामान्यांचे योगदान व त्यांचा पाठिंबा आहे, तोपर्यंत अशा संकटांची, आव्हानाची चिंता करण्याचे काहीही कारण नाही. सर्वकाही ठीक होईल अशा विश्वास देत, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सरकार येईल याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचा पुनरुच्चार करत, सरकार बनवण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आमच्याकडे असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
ते म्हणाले, ”आम्ही सर्वजण पक्षासाठी काम करणारे लोक आहोत. महाराष्ट्रातील सामान्य माणसाचे तसेच राज्याचे हित हे आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आमच्याकडे नेते व कार्यकर्त्यांची फळीच्या फळी आहे.”
अजित पवारांनी जो निर्णय घेतला आहे, याच्या पाठीमागे तुमचा हात असल्याचा गैरसमज कसा दूर करणार, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘ या सर्व घडामोडीत जर माझा हात असता, तर यावर मी पक्षातील लोकांना सांगितले असते.’ यामध्ये माझा कोणताही सहभाग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पदभार स्वीकारला आहे. याबाबत शरद पवार यांना विचारले असता, त्या दोघांनी त्या-त्या पदाची शपथ घेतली आहे. मात्र या निवडीबाबत न्यायालयात प्रकरण आहे. सरकार स्थापन करण्यासाठी घटनेप्रमाणे आवश्यक पाठिंबा आहे की नाही, याबाबतची स्थिती राज्यपालांना तीस तारखेच्या आत दाखवणे गरजेचे आहे.बहुमत सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे भाजपने राज्यपालांना सुरुवातीला सांगितले. मात्र त्यानंतर आता त्यांनी सरकारबनवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने जो सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केलेला असावा. मात्र त्यांना व्यक्तिगत पाठिंबा त्यांना असू शकतो, पण पक्षाचा पाठिंबा भाजपला नाही. आमचा पक्ष भाजपमध्ये सहभागी नाही. राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान होईल, त्यावेळी सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असेही शरद पवार यांनी सांगितले.
भाजपच्या ऑपरेशन लोटसबद्दल विचारले असता, इतरांपेक्षा आम्ही काहीतरी वेगळं करतोय हे भाजप दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्राच्या सत्तेचा गैरवापर करून राज्यपालांच्या अधिकाराला हरताळा फासून कर्नाटकमध्ये काहीतरी करण्याचा वेगळेपणा भाजपने देशाला दाखवून दिला आहे. तो प्रयत्न राज्यातदेखील सुरू आहे. भाजपबरोबर अजित पवार हेही सत्तेमध्ये सामील झालेत. मात्र हा पक्षाचा निर्णय नसून, त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय आहे. त्यांच्या या निर्णयास पक्षांची सहमतीही नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
महाविकास आघाडीकडून सत्तास्थापनेचा उशीर झाल्यानेच अजित पवार यांनी बंडकेल्याबाबत विचारले असता, महाविकास आघाडी ही काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांची आहे. यामध्ये शिवसेनेची वैचारिक भूमिका राष्ट्रवादीपेक्षा वेगळी असू शकते किंवा आमची भूमिका शिवसेनेपेक्षा वेगळी असू शकते. मात्र सरकार स्थापन करताना या बाबी बाजूला ठेऊन, सर्वसामान्यांचा विचार करून, महाराष्ट्राला किमान स्थिर सरकार देण्यापर्यंत आम्ही येऊन पोहोचलो आहे. यासाठी वेळ लागतोच, तो लागलाही पाहिजे. यात पूर्ण विचारांती निर्णय होणे महत्त्वाचा असतो.
एखाद्याचे वैयक्तिक मत वेगळे असल्यास ते बैठकीत मांडणे गरजेचे आहे. मात्र एक व्यक्ती असा वेगळा निर्णय घेऊ शकत नाही, अशी टीका त्यांनी अजित पवारांवर केली. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे अजित पवार यांची हकालपट्टी होणार का? या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, हकालपट्टी करणे यावर कोणी एकजण निर्णय घेऊ शकत नाही. यासाठी पक्षामध्ये चर्चा होऊन निर्णय घेतला जातो. अजित पवारांसंदर्भात जो काय निर्णय होईल, तो पक्षाच्यावतीने घेतला जाईल.