नवी दिल्ली : देशात कांद्याचे दर भाव चांगलेच कडाडले आहेत. कांद्याच्या दरवाढीवरून संसदेसह देशभरात एकच गोंधळ सुरू आहे. या मुद्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. कांद्याच्या दरवाढीविषयी केंद्र सरकार जबाबदार आहे. त्याचबरोबर दर नियंत्रणात आणण्यासाठी तुर्कीतून कांद्याची आयात करण्यात आली आहे. केंद्र सरकार ही चूक करत असल्याचा असा सूचक सल्ला देत पवारांनी दिला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत शरद पवार यांनी राज्यातील सत्तांतर, महाविकास आघाडीच्या स्थापनेसह कांद्याची दरवाढ याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. देशातील कांद्याच्या दरवाढीचा मुद्दा सध्या देशभरात चर्चेत आहेत. संसदेमध्येही या मुद्यावर बराच गोंधळ झाला. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी भाववाढीच्या कारणाचा खुलासा केला. यावेळी तीन ते चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला. पण, केंद्र सरकारने त्यावेळी चांगला भाव कांद्याला दिला नाही. यामुळे पुढच्या हंगामात कांदा उत्पादक शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळला. आता आपल्याला तुर्कीतून कांदा आयात करावा लागत आहे आणि कांदा आयात करून केंद्र सरकारने नक्कीच चूक केली आहे. या सगळ्यांविषयी मी तीन महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. त्यात हे असे घडेल असा इशारा दिला असल्याचे धक्कादायक माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यातील सत्ता स्थापनेविषयी बोलताना शरद पवार यांनी ज्यावेळी काम करताना एकत्र येण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही त्यावेळी एकमेकांसोबत तडजोड करावीच लागते असे म्हटले आहे. तसेच इथे फक्त शिवसेनेने तडजोड केली नाही तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनेदेखील मोठी तडजोड केली असल्याचेही यावेळी पवारांनी स्पष्ट केले.