मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सांगितले की, महाराष्ट्रात “ऐतिहासिक आर्थिक संकट’ आहे आणि राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कर्ज घेण्याशिवाय राज्य सरकारकडे कोणताही पर्याय नाही. अशा मोठ्या संकटात राज्य सरकार एकट्याने काहीही करू शकत नाही. या विषयावर चर्चा करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन, असे ते म्हणाले.
पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेले शरद पवार उस्मानाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. गेल्या आठवड्यात, पुणे, औरंगाबाद आणि कोकण विभागात मुसळधार पाऊस व पुरामुळे किमान 48 जणांचा बळी गेला, तर लाखों हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शुक्रवारपर्यंत सोलापुरातील 32,500 आणि पुण्यात 6,000, हून अधिक अशा सुमारे 40 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
उस्मानाबाद, लातूर,सोलापूर, नांदेड आणि पंढरपूर (सोलापुर) या सर्वांत जास्त नुकसान झालेल्या ठिकाणी भेट दिल्यानंतर माजी केंद्रीय कृषिमंत्री पवार म्हणाले की, सोयाबीन, ऊस या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य दौऱ्यावर का येत नाहीत, असे विचारले असता, महाराष्ट्र सरकारमधील युतीतील भागीदार असलेल्या पक्षाचे अध्यक्ष म्हणाले, “ठाकरे यांनी मदतीचे नियोजन करण्यासाठी एका जागी राहावे, अशी मी विनंती केली. प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे.
पवार शेवटी म्हणाले की, पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्य्ांना बॅंकांनी लादलेल्या अटी व अडचणींचा सामना करावा लागला आहे. तसेच पुरामुळे जमीनही नष्ट झाली आहे.
राज्य सरकार केंद्राकडून मदतीची अपेक्षा करत असून अद्यापही केंद्राने मदत जाहीर न केल्याबद्दल पवार यांनी नाराजी व्यक्त केली. अशा नैसर्गिक संकटाच्या वेळी राज्य व केंद्र सरकार एकत्र काम करतात. अशामोठ्या संकटात राज्य सरकार एकट्याने काहीही करू शकत नाही, असेही ते म्हणाले.