पिंपळगाव: देशाचे पंतप्रधान देशाच्या बाहेर जातात आणि देशाची भूमिका मांडतात. या पदाची प्रतिष्ठा आणि मान राखला पाहिजे. पण आजचे राज्यकर्ते ही प्रतिष्ठा ठेवताना दिसत नाहीत, असे शरद पवार म्हणाले. ते पिंपळगाव येथील सभेत बोलत होते.
हंगर इंडेक्सनुसार भारतातील मुलांना योग्य, पोषक अन्न मिळत नाही. आपल्यापेक्षा नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान येथील मुलांना जास्त अन्न मिळतं. जो अन्नधान्य निर्यात करतो त्या देशात मुलांना खायला अन्न नाही, ही बातमी जागतिक पातळीवर आपल्याबद्दल छापून येते. इतकी आपल्या देशाची बेइज्जती यांच्या राजवटीत होते आहे. म्हणूनच हे चित्र आपल्याला आता बदलायचं आहे आणि परिवर्तन घडवायचं आहे, असे आवाहन पवार यांनी केले.
निर्मला सीतारामन अमेरिकेत जाऊन म्हणाल्या की देशाचे वाटोळे माजी पंतप्रधान व गव्हर्नर यांनी केले. या दोघांमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आली. अमेरिकेत जाऊन आपल्या देशाबद्दल अशी टीकाटिप्पणी करतात, देशाची काही सभ्यता,प्रतिष्ठा,पथ्य याची जाण या लोकांना आहे की नाही?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.