Sharad Pawar – बारामती येथील गोविंदबाग शारदानगर येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या ऊस व केळी पिकांची पाहणी शरद पवार यांनी केली. यावेळी एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पिकांमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ व एआय तज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी उपस्थितांना दिली. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ऊसाची जाडी वाढणे, कांड्याचा पेरा लांब होणे, फुटव्यांचे नियंत्रण राहणे, उत्पादन खर्च कमी करून अधिक गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणे शक्य होत असल्याचे यावेळी स्पष्ट केले. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचे ध्येय समोर ठेवून शरद पवार या वयातही मेहनत घेत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी युगेंद्र पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे, सदाशिव सातव, प्रा. डॉ. दीपक पवार, कृषिभूषण प्रल्हाद वरे, गणपत देवकाते, ॲड. राजेंद्र काटे, सुशीलकुमार जगताप, गौरव जाधव, विनय शेळके, शिरूभाऊ येळे आदी मान्यवर उपस्थित होते. सेंद्रिय शेतीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशात फलोत्पादन क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. १९८९ मध्ये मुख्यमंत्री असताना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के फळबाग योजना राबवून राज्यातील गरीब शेतकऱ्यांच्या शेतात फळपिक लागवडीची क्रांती घडवून आणली. NHM आणि NHB योजनांद्वारे धोरणे राबविली. परिणामी महाराष्ट्रासह देशातून फळपिकांची निर्यात वाढली. परकीय चलन मिळाले. सेंद्रिय व विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली महाऑरगॅनिक अँड रेशेड्युफ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) ची स्थापना केली आहे. संस्थेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना उत्पादन, तंत्रज्ञान व मार्केटिंगबाबत मार्गदर्शन केले जात आहे. शरद पवार यांनी पाच वर्षांत सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य व केंद्र शासन स्तरावर बैठका घेऊन योगदान दिले आहे.