पुणे – दसरा मेळाव्यावरून गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमध्ये चांगलाच संघर्ष सुरु असल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. दसरा मेळावा अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना दोन्हीही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता दसरा मेळव्यावरून दोन्ही गटाला मर्यादा न ओलांडण्याचा सल्ला दिला आहे.माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी यंदा होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत भाष्य केलं.
राष्ट्रवादीचा शिवसेनेच्या दसरा मेळाव्याशी काहीही संबंध नसल्याचेही पवार यावेळी म्हणाले. दुर्देवानं एका पक्षाचे दोन भाग झाले. त्यात स्पर्धा सुरू झाली. ती स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या स्पर्धेची सूत्रे दसऱ्या मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारले गेले. या गोष्टी नवीन नाही. संघर्ष होतो. ते नवीन नाही. पण त्याला काही मर्यादा ठेवली पाहिजे. ती मर्यादा ओलांडून होत असेल तर राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही, असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कटूता पसेल असं काही करु नये अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त करुन दिली. तसेच ते एका पक्षाचे नेते नसून १४ कोटी महाराष्ट्रातील जनतेचं प्रतिनिधित्व करतात असं पवार यावेळी म्हणाले. तसेच दोन्हीही बाजूंकडून कटुता नसलेली मांडणी केली गेली तर राज्यातील वातावरण सुधारायला मदत होईल असा आशावाद देखील पवारांनी यावेळी व्यक्त केला.