मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यामुळे मागील दोन दिवसांपासून जे राजकीय नाट्य सुरु आहे त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राणा दाम्पत्यांवर परखड शब्दात टीका केली आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील अनेक मुद्द्यावर आपले स्पष्ट मत मांडले.
राज्यात हनुमान चालीसावरुन सुरु असलेल्या वादावर पवार यांनी प्रतिक्रिया देताना, “धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या निवासस्थानी करु शकता. पण तो कार्यक्रम माझ्या दारात करतो म्हटल्यावर त्याबद्दलची अस्वस्थता माझ्याबद्दल आस्था असलेल्या सहकाऱ्यांमध्ये निर्माण झाली तर त्यांना दोष देता येणार नाही. येत्या काही दिवसात हे वातावरण शमेल अशी अपेक्षा आहे,” असे शरद पवार यांनी म्हटले.
“मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण त्यांचं एकेरी नाव घेत वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. मुख्यमंत्री म्हणजे एक संस्था आहे. त्याचा आदर ठेवला पाहिजे, पण ते न ठेवण्याची भूमिका काहीजण घेतात. आणि तुम्हाला धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या घरी करु शकता. पण माझ्या दारात येऊन करतो म्हटल्यावर त्यामुळे माझ्याबद्दल आस्था असणाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली तर दोष देता येणार नाही. अलीकडे या पद्धतीची भूमिका काहीजण मांडत आहे. पण लवकरच हे सर्व शांत होईल अशी आशा करुयात. आम्हा लोकांची भूमिका मतभेद कसा वाढणार नाही आणि राज्याची जुनी परंपरा आहे ती कशी कायम राहील याची काळजी घेण्याचा प्रयत्न असेल,” असे शरद पवारांनी म्हटले.
दरम्यान, राज्यात विरोधकांकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होत आहे यावर बोलताना शरद पवार यांनी,”सत्ता गेल्यानंतर काही लोकांची अस्वस्थता आता उघडपणे दिसून येत आहे. सगळे काय माझ्यासारखे नसतात. १९८० मध्ये माझं सरकार बर्खास्त केलं. रात्री १२.३० वाजता मुख्य सचिवांनी मला ही माहिती दिली. त्यानंतर तीन चार मित्रांना बोलावलं आणि घरातल सामान आवरलं. सकाळी ७ वाजता दुसऱ्या जागेत राहायला गेलो, सरकारी गाडी सोडली. त्यादिवशी इंग्लंड आणि भारताचा सामना होता. १० वाजता वानखेडेवर सामना पाहण्यासाठी गेलो आणि दिवसभर सामन्याचा आनंद लुटला”. असा किस्सा यावेळी त्यांनी सांगितला.
“सत्ता येते आणि जाते…पण त्यामुळे अस्वस्थ होण्याचं कारण नाही. पण सध्या काही लोक फार अस्वस्थ आहेत. पण त्यांना दोष देता येऊ शकत नाही. कारण निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार, मी येणार अशा घोषणा त्यांनी केल्या. पण ते घडू शकलं नाही याची अस्वस्थता असते. पण या सर्वांना या परिस्थितीतून काय परिणाम हे लक्षात येईल आणि योग्य वातावरण निर्माण करण्यास सहकार्य लागेल अशी अपेक्षा करुयात,” असे शरद पवार म्हणाले.