नवी दिल्ली – ज्या लोकांच्या हातात देशाची सत्ता आहे, तेच देशात असंतोष पसरवण्याचे काम करत आहेत, असा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. तसेच अनेक राज्यात आमदारांना चोरून, त्यांना पैशांचे आमिष देवून सत्ता आणण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे सत्तेचे मूल्य न जपणाऱ्यांना राजकारण्यांना नागरिकांनी धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा 25वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारिणीतील नेते उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
शरद पवार म्हणाले की, मागच्या 24 वर्षात वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना राष्ट्रवादी पक्षाने केला. शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जन्म झाला आहे. नागालॅंडसारख्या महत्त्वपूर्ण राज्यात पक्षाचे सात प्रतिनिधी निवडून दिले. तिथे त्यांनी भाजपचा पराभव केला, याचा आनंद आहे. त्यांचे अभिनंदन करणे हे माझे कर्तव्य आहे, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
मोदी सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले की, ज्या लोकांच्या हातात देशाची सत्ता आहे. तेच देशात असंतोषाचे वातावरण निर्माण करत आहेत. एक दिवस असा नाही जात की, देशातील कोपऱ्यात अत्याचाराच्या घटना घडत नाही. हातात सत्ता आल्यानंतर त्याचा गैरवापर कसा करावा हे त्यांनी दाखवून दिले आहे. दररोज देशात महिलांवर, मुलींवर, लहान मुलांवर अत्याचार होत आहेत.
तसेच देशभरातील शेतकऱ्यांची स्थितीही गंभीर आहे. देशात एकीकडे शेतकऱ्यांना चांगली किंमत देण्याची गोष्ट करण्यात येतात. दुसरीकडे मात्र कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी संकटात आहे, असे म्हणत पवारांनी काळजी व्यक्त केली.
तसेच, बेरोजगारी ही देशातील सध्या सर्वात मोठी समस्या आहे. तरुण वर्ग या समस्येमुळे हवालदिल झाला आहे. त्यामुळे आता सगळ्यांना कळून चुकले आहे की यांची सत्ता आमच्या कामाची नाही. त्यांच्याकडून फक्त आश्वासने देण्यात येत आहे हे लोकांच्या लक्षात आल्याने बदलाला सुरुवात झाली आहे. देशातील अनेक राज्यात नागरिकांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम केले आहे, असेही पवार म्हणाले.