मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांना भाजपनेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना फटकारले.
शरद पवार म्हणाले की, आझाद मैदानावरील मोर्चासाठी शेतकरी एवढ्या लांबवरुन चालत आले होते. त्यांचे पाय सुजले होते, फोड आले होते. पण ते एका तडफेने आझाद मैदानावर पोहोचले होते. अशावेळी विरोधी पक्षनेत्याने खरंतर या शेतकऱ्यांची भेट घ्यायला हवी होती. मात्र, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्याने अशाप्रकारचे वक्तव्य करणे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. एकेकाळी मी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, याची मला आता लाज वाटते, अशा शब्दात पवारांनी दरेकरांना फटकारले.
प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदान येथे पार पडलेल्या शेतकरी मोर्चावर टीका केली होती. या आंदोलनात शेतकरी कमी इतर लोकच जास्त घुसवली आहेत. भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला होता. आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसल्यानेच अशाप्रकारची गर्दी गोळा करण्याची आघाडीवर वेळ आल्याची टीकाही त्यांनी केली होती.