बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड येथील सभेत बोलताना पक्षांतर केलेल्या नेत्यांवर टीका केली. बीड जिल्ह्यात नमिता मुंडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
शरद पवार म्हणाले, मी गुदमरलो होतो म्हणून त्या घरी गेलो असे सांगत इथल्या नेतृत्वाने नवा घरोबा केला. ज्यांना तीन वेळा मंत्री केलं, सत्तेची ऊब आणि शक्ती दिली ते असं वागले.
बीडला सध्या एक वेगळेच वातावरण आहे. आपण ज्यांना साथ दिली, त्यांनी भलत्याच घरी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्णय बीडकरांनी घेतला आहे.
१९८० साली मी बीड जिल्ह्यात निवडणुकीसाठी जे उमेदवार दिले ते सगळे निवडून आले, त्याची पुनरावृत्ती यावेळी नक्की होणार. आज नवी पिढी उभारण्याची भूमिका आपण घेतली आहे. या भूमिकेला मोठा पाठिंबा बीड जिल्ह्यातून मिळतोय. परिवर्तनाच्या या लढ्यात बीडची जनता पुढाकार घेईल, असे पवार म्हणाले.