मुंबई – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियासह अनेकांनी खरमरीत प्रतिक्रिया दिल्या. या वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनीही समाचार घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अभिनंदन मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.
भाजप नेते पवार हे अत्यंत कमी उंचीचे नेते असल्याचे सांगत आहेत, यावर तुम्हाला काय वाटते?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला होता. यावर उद्धव ठाकरे म्हणाले कि, जाऊ द्या हो. अशा प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांबद्दल मला काही बोलायचीसुद्धा गरज वाटत नाही. त्यांचे कुणी सीरियसली घेत नाही. ऐकू पण नये असली लोकं आहेत ही. मान्य. पण बोलणाऱ्यांची लायकी काय आहे? कोणीही काहीही बोलेल आणि काहीही ऐकायचं? कशाला वेळ घालवतायेत त्यात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता केली.
दरम्यान, प्रकरण वाढत असल्याचे दिसताच चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले होते कि, पवार साहेबांबद्दल मी अनेकवेळा चांगले बोललो, त्यांचे कौतुक केले. त्यावेळी कोणी बोलले नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. देवेंद्र फडणवीस यांच्यासह माझ्यावरही टीका करतात. हे कसे चालते? असा सवाल करत माझ्या दृष्टीने हा विषय आता संपला आहे. ज्यांना पवारांवरची निष्ठा दाखवायची आहे, त्यांनी बोलत राहावे, मी कोणाला घाबरत नाही,’ असेही पाटील सांगितले होते.