मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण करण्यात आले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
राहुल गांधी यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका वृत्तपत्राने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले कि, कोणत्याही पक्षामध्ये त्याच्या नेतृत्वाची मान्यता पक्षात आणि लोकांमध्ये किती असते, हे पाहणे महत्त्वाचे असते. आजही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पाहण्यास मिळत आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी हे दोघेही त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे बरेच नेते हे त्यांच्या विचारांचे आहेत. परंतु, राहुल गांधी यांच्या कामात सातत्याचा थोडासा अभाव आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे अजूनही नर्व्हस, कोणताही ठोस गुण नसलेले विद्यार्थीच आहेत, अशा शब्दात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांचे वर्णन केले आहे. ओबामा यांनी ‘अ प्रोमिस्ड लॅन्ड’ या पुस्तकातून राहुल गांधी यांच्यावर भाष्य केले होते.