दिल्ली – लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतर प्रथमच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवास्थानी जाऊन भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या वाट्याला मानहानीकारक पराभव आला असून महाराष्ट्रामध्ये तर काँग्रेसचा केवळ १ खासदार निवडून आला आहे.
तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारणीकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता परंतु काँग्रेस कार्यकारणीने त्यांचा राजीनामा एकमुखाने नाकारत काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हेच सर्वोत्तम नेते असल्याचं म्हंटल होतं. मात्र राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर अद्याप ठाम आहेत.
राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीदरम्यान दोन नेत्यांनी जवळपास एक तासभर चर्चा केली. या बैठकीमध्ये देशातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा केल्याचे वृत्त असून शरद पवार यांनी यावेळी राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये असा सल्ला दिल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, राहुल गांधींसोबतच्या भेटीबाबत स्वतः शरद पवार यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली असून राहुल गांधी यांच्यासोबत महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांबाबत व महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळाबाबत चर्चा केल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
Congress President Mr. @RahulGandhi met up with me today at my residence in Delhi. We discussed matters pertaining to the forthcoming Vidhan Sabha Elections and the drought situation in Maharashtra. pic.twitter.com/SUQHzjAbOB
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 30, 2019