सातारा – राज्यात सध्या राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राजकारण चांगलच तापायला सुरुवात झालेली असताना अनेक धक्कादायक खुलासे समोर येताहेत. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही कुठंही जाणार नाही आणि कोणीही फुटणार नाही असं खुद्द शरद पवारांनी सांगितलं असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
शिवसेना आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षावरील निकाल केव्हाही येऊ शकतो. अशात निकाल आल्यानंतर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील सरकारच नेमकं काय होणार असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. अशात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या.
“शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की,राष्ट्रवादीतील कोणीही फुटणार नाही. शिंदे गटातील आमदार अपात्र नक्कीच होणार आहेत” असं स्पष्ट मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केले.
सरकार अस्थिर होणार असल्याने हे येणार ते येणार अशा वावड्या उठवल्या जात आहेत. तुमच्यात दम असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून लगेच निवडणुका जाहीर करा असं थेट आव्हान देखील यावेळी शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना दिल. तसेच यावेळी महेश शिंदेंच्या ‘आसराणी’ शब्दावरून केलेल्या टीकेला गब्बरसिग म्हणत उत्तर देखील दिले.