मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवानगडावरील दसरा मेळाव उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्याच पक्षातील सहकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. विरोधकांनी आता सरकार पाडण्याचे मुहूर्त जाहीर करण्याऐवजी विरोधकाच्या भूमिकेत काम करावे असा घरचा आहेर पंकजा मुंडे यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करण्याएवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत असे म्हटले . दरम्यान त्यांच्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीसाठी पंकजा मुंडे दिल्लीली रवाना झाल्या आहेत. यावेळी मुंबई विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवारांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आले असता त्यांच्या बोलण्याने आपण लहानही होत नाही आणि मोठ्याही होत नाही अशी प्रतिक्रिया दिली.
“मी पवार साहेबांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण मोबाइलवर पाहिलं. मी मोठी नेता नाही हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मी लहानच नेता आहे. पण मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोललं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. तरीही ते असं म्हणाले असतील तर त्यामुळे मी लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. मी आहे तेवढीच आहे. ते आमच्यापेक्षा मोठे आहेत त्यात काही वाद नाही,” असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा नेमका अर्थ विचारण्यात आलं असता म्हणाल्या की, “आम्ही आता ज्या भूमिकेत आहोत त्यात सक्षमपणे काम केलं पाहिजे आणि ते करतही आहोत. कार्यकर्त्यांमध्ये जर आपण सत्तांतर होणार असा विचार निर्माण करत राहिलो तर काम करताना त्यांची पूर्ण ऊर्जा वापरली जाणार नाही. त्यामुळे त्या भूमिकेत मी स्वत: शिरली आहे”. सरकार किंवा विरोधी पक्ष दोघेही जनतेसाठी काम करत असतात. सरकार राहतंय की सरकार जातंय हा विषय महत्त्वाचा नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
बैठकीसंबधी विचारण्यात आले असता तो विषय पक्षांतर्गंत आहे. सचिवांची नियमित बैठक होत असते आणि त्यासाठी मी दर १५ दिवसांनी दिल्लीला जात असते असे त्यांनी सांगितले . तसंच बीडचे पालकमंत्री पंकजा मुंडे पालकमंत्री असताना न्याय मिळाला नाही म्हणतात यावर उत्तर देताना हे जनताच ठरवेल असे त्यांनी म्हटले. तसंच उस्मानाबाद, मराठवाडा दौऱ्यात फडणवीसांसोबत तुम्ही नव्हता असं विचारण्यात आलं असता, “तेव्हा माझी तब्येत बरी नव्हती. देवेंद्र फडणवीसांनाही ते माहिती आहे. अन्यथा मी सर्व व्यासपीठांवर असतो. जिथे मला निमंत्रण असतं तिथे माझी उपस्थिती असते,” असे त्यांनी सांगितले.