मुंबई : कोरोनाच्या साथीमुळे देशातील व्यापार थंडावला आहे. त्यामुळे त्याच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने तयार रहावे, असे आवाहन देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे केले.
पवार यांनी समाज माध्यमांद्वारे देशवासीयांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी देशवासीयांना सावध राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था सध्या नाजूक अवस्थेत आहे. तज्ज्ञांनी देशाचा विकास दर दोन टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.
या विषाणूंचा प्रसार होऊ नये, म्हणून नागरिकांनी घरात रहावे. त्याचवेळी नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळावेत. देशातील सर्व प्रकारचे व्यवसाय या साथीमुळे बंद आहेत. त्याचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांना सामोरे जायला सर्वांनी तयार रहायला हवे. लोकांनी अनवश्यक खर्च करायची त्यांची सवय सोडून द्यायला हवी.
नागरिकांनी घरातच रहावे अन्यथा त्यांना घरात ठेवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागेल,असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान शुक्रवारी रिझर्व्ह बॅंकेने सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्ते तीन महिने वसूल करू नयेत, अशी सूचना देतानाच रेपो रेट कमी केला. 11 वर्षातील हा सर्वात कमी रेपो रेट आहे. सरकारने कोरोनाशी लढण्यासाठी उचललेल्या उपाय योजनांना साथ देण्यासाठी ही उपाय योजना केली.