पंढरपूर – शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत व महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यादरम्यान झालेल्या भेटीमुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. या भेटीनंतर तातडीने महाविकास आघाडीचे मार्गदर्शक असलेल्या शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राज्यात राजकीय भूकंप होणार काय? अशा चर्चांना हवा मिळाली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्वतः राऊत-फडणवीस भेट व त्यानंतर सुरु झालेल्या राजकीय चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांनी, ““संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुलखातीचा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही. संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेतली होती. त्यावेळीच त्यांनी इतर पक्षांच्या नेत्याच्या मुलाखती घेणार असं जाहीर केलं होतं. त्यामुळे त्यांच्या या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही.” अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, राऊत-फडणवीस भेटीनंतर आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला खुली ऑर देऊ केली होती. याबाबत प्रतिक्रिया देताना पवार यांनी, “रामदास आठवलेंचा एक आमदार तरी आहे का? एक खासदार तरी आहे का? ते बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात. त्यांची कोणी गांभीर्याने नोंद घेत नाही, सभागृहातही घेत नाही आणि बाहेरही घेत नाही.” असं वक्तव्य करत त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं सांगितलं.
यावेळी पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असा व्यक्त केलेला अंदाज ‘राज्यात मध्यावधीची शक्यता नाही’ असं म्हणत फेटाळून लावला.