मुंबई – भीमा-कोरेगाव हिंसाचाराला तत्कालीन राज्य सरकार जबाबदार होते. हिंसा नियंत्रण करता आले असते, पण तसे केले गेले नाही, असे शरद पवार यांनी आयोगासमोर सांगितले आहे. न्या. जे. एन. पटेल आयोगाकडून भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी सुरू आहे.
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा जबाब चौकशी समितीने नोंदवला आहे. यावेळी शरद पवार यांनी स्पष्टपणे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे. यावर आता त्यांच्या या आरोपावर केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास आठवले म्हणाले,“शरद पवार यांनी मांडलेल्या मताशी मी सहमत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दंगल चांगल्या पद्धतीने हाताळली होती. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात दंगल होऊ दिली नाही.’
ते पुढे म्हणाले, ‘भाजपा सरकारने दंगल वाढवण्याचा विषय अजिबात येत नाही. कारण सरकार भाजपाचं असलं तरी दंगल करणारे भाजपाचे नव्हते. दंगल करणारे सर्व लोक स्थानिक होते.” असे म्हणत आठवले यांनी आपलं मत मांडलं आहे.
दरम्यान, आणखी एका घटनेच्या संदर्भात, आयोगाने त्यांना विचारले की 3 जानेवारी 2018 रोजी प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्यानंतर दंगलीत सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले. त्यासाठी कोणाला जबाबदार धरायचे? त्यावर पवार म्हणाले, न्यायप्रविष्ट असलेल्या कोणत्याही प्रकरणावर मी माझे मत नोंदवू शकत नाही.
1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार यांनी हिंसाचारात कथित हिंदू संघटनांचा सहभाग असल्याचा दावा करत तत्कालीन सरकारच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली. कोलकाताचे माजी मुख्य न्यायाधीश जेएन पटेल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक हे या आयोगाचे सदस्य आहेत.