मुंबई: भाजपला इतक्या जागा मिळणे अनपेक्षित असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. देशात काही जागांवर आघाडीला यश मिळेल अशी अपेक्षा होती, असे झाले नाही. लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत संशयाचे भूत असून यापूर्वी नरसिंहराव, राजीव गांधी यांचा देखील भरघोस मताधिक्याने विजय झाला होता, पण त्यावेळी ईव्हीएमवर शंका उपस्थित झाल्या नव्हत्या. पण यंदा प्रथमच ईव्हीएमबाबत शंका उपस्थित होत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांचाही मताधिक्याने विजय झाला होता. परंतु, त्यावेळी कोणी शंका घेतली नव्हती.
शरद पवार समोर म्हणाले, सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अंत:करणापासून आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेससह महाआघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात प्रचंड कष्ट घेतले, त्यांचेही मी आभार मानतो.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आतापर्यंत चार जागा जिंकल्या आहेत. परभणी, माढा मतदारसंघातील सर्व फेऱ्यांची मतदान मोजणी अद्याप बाकी आहे. या मतदारसंघांबाबत मी आशावादी आहे.
लोकांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारत आहोत. पराभवाबाबत विचार करू, चिंतन करू आणि लोकांशी संपर्क वाढवू. निवडणूक झाली आहे, निकाल लागले आहेत. पण आता लक्ष दुष्काळाकडे आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत ते पुढेही सुरुच ठेवणार.