मुंबई – शरद पवारसाहेब हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार आहे. माझा पक्ष वाढवणे माझा अधिकार आहे. त्यामुळे शरद पवारसाहेब आमच्यावर नाराज नाही आहेत. भाजपाकडून महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. संघटना आणि सरकारमध्ये फरक असतो, असे नाना पटोले यांनी सांगितले.
मुंबईत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. मुंबईतील हॅंगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत सायकल चालवत राज्यपालांना निवेदन देण्यात आले.
नाना पटोले म्हणाले, केंद्रात बसलेले मोदी भाजपाचे सरकार या देशाला आर्थिकरित्या कमजोर करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी असतानाही रोज पेट्रोल, डिझेल, सीएनजी सारख्या इंधनाचे दर वाढवण्याचे काम मुद्दाम करत आहेत. अशा वेळी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या आदेशावरुन संपूर्ण देशात आंदोलनं करत आहेत.
महाराष्ट्रात 17 तारखेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शरद पवार रिमोट कंट्रोल आहेत आणि ते आमच्यासाठी आदरणीय आहेत. वेळ येईल तेव्हा मी स्वत: पवार यांना भेटेन. परंतु ती वेळ अद्याप आली नाही, असे म्हणत त्यांनी हे प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला.
वसुलीचा रिमोटही शरद पवार?
नाना पटोले म्हणतात महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार आहेत. त्यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे. केवळ सरकारचेच नाही तर राज्यात सुरू असलेल्या वसुलीचा रिमोटही तेच आहेत?, असे नानांना सुचवायचे आहे का? असा खोचक टोला भाजपा आमदार अतुल भातखळर यांनी लगावला आहे. तसेच प्रॉब्लेम फक्त एवढा आहे, की टीव्ही घरातील कडी बंद असल्यामुळे रिमोट अगदीच निरुपयोगी झाला आहे, असेही ते म्हणाले.