मुंबई : केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कोल इंडियाच देशातील वीज प्रकल्पांतील कोळसा टंचाईला आणि पर्यायाने वीजटंचाईला जबाबदार आहे आणि या विषयावर भाजपाचे नेते देशाची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट होते, अशा शब्दांत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर हल्ला चढवला. मात्र त्यांच्या या टीकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करत सत्ताधाऱ्यांना टोला लगावलेला आहे.
“केंद्राने कोळसा दिला नाही म्हणून वीज कमी निर्माण होणार आहे असे म्हणत आहेत. पण हे सांगणार नाही की, केंद्राने आग्रह धरला होता की पावसामुळे कोळसा कमी मिळेल. वेळीच साठा करा पण तो आम्ही केला नाही हे सरकार सांगणार नाही. तसे नाचता येईना अंगण वाकडे. शरद पवारांना केंद्राने तुम्ही आमच्याबरोबर सरकार बनवा अशी ऑफर दिली होती तर न स्विकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. केंद्रामध्ये सरकार असणाऱ्या पक्षासोबत महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्याला त्यांनी प्राधान्य दिले असते. त्यामुळे आता सर्वसामान्य माणसांना हे काय म्हणतात आणि त्याचा काय अर्थ होतो हे नीट कळतं,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
ओबीसींना ७२ हॉस्टेल न दिल्याने वडेट्टीवार नाराज असल्याचेही म्हटले जात आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाविकास आघाडीतील नाराजी ही काहीतरी ताटात आणखी काहीतरी पाडून घेण्यासाठी असते. त्यामुळे त्याच्यावरून काही निष्कर्ष काढण्याचे कारण नाही,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील १४ वर्षीय मुलीच्या हत्येबाबतही भाष्य केले आहे. “मला चिंताही व्यक्त करायची आहे आणि जुनी आठवण करुन द्यायचीय की, देवेंद्र फडणवीस ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी नागपूरमध्ये खुट्ट जरी झाले राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये पाकिटमारी असे बोलले जायचे. मग आता नितीन राऊत काय झोपा काढतायत काय? त्यांना नागपूरमध्ये झालेले गुन्हे कळत नाही काय?
महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत. महाराष्ट्र दिल्लीपेक्षाही मुलींच्या सुरक्षितेबाबत पुढे होता. तो आता पूर्ण रसातळाला गेला आहे. घरातल्या कुणाला तरी सोबत घेतल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. या स्थितीवर सुप्रिया सुळे का बोलत नाहीत? त्यांना माझ्या काळामध्ये रस्त्याचे खड्डे दिसायचे आणि त्या सेल्फी काढायच्या. त्यांना हे बलात्कार आणि कोयत्याने वार करने दिसत नाही का? सत्तेसाठी महिलांच्या सुरक्षेबाबतही जुळवून घ्याचये?” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.