मुंबई – विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १४ दिवस झाले असूनही अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद आणि भाजपचा नकार यावर युतीची सर्व गणिते अडून बसली आहेत. अशातच शिवसेना नेते संजय राऊत सातत्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे नवे समीकरण महाराष्ट्रात अस्तित्वात येणार का? अशी चर्चा सुरु आहे. परंतु, शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षातच बसणार, अशी ठाम भूमिका घेतली आहे. यावेळी पवारांनी भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवार म्हणाले कि, भाजपला कोणत्याही राज्यांमध्ये बहुमताचा आकडा सिद्ध करण्यात अडचणी आल्या तेव्हा सत्तास्थापनेसाठी शहा यांची राजकीय खेळी भाजपसाठी नेहमीच तारणहार ठरली आहे. त्यामुळे आपणही त्यांचे हे कसब पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे पवार म्हणाले आहेत. शाह हे ट्रबलशूटर आहेत. याआधी काही राज्यात सत्तास्थापनेदरम्यान त्यांनी भेट दिली. मात्र आता ते येथे आले नाहीत, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, भाजप शिवसेनेने या निवडणुकीत बहुमत प्राप्त केल आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावे. आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत, असेही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच मला मुख्यमंत्री बनण्यात कोणताही रस नसल्याचे शरद पवार यांनी म्हणत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.