नवी दिल्ली: सैनिक कुठे आणि केव्हा सशस्त्र असतील आणि कुठे नसतील ते आंतरराष्ट्रीय करारांनुसार ठरते. त्यामुळे तशाप्रकारच्या संवेदशील मुद्द्यांवर बोलताना खबरदारी घेतली जायला हवी, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीत बोलताना म्हटले. त्यातून त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना अनुभवी सल्ला दिल्याचे मानले जात आहे.
नि:शस्त्र सैनिकांना धोक्यात घालून शहीद व्हायला भाग पाडण्यास कोण जबाबदार आहे, असा सवाल राहुल यांनी विचारला होता. त्यापार्श्वभूमीवर, पवार यांनी मांडलेल्या भूमिकेला महत्व आहे. पूर्व लडाखमधील तणाव दूर करण्यासाठी राजनैतिक पर्यायांचा अवलंब करायला हवा.
चीनी सैनिकांनी गलवान खोरे सोडावे यासाठी पाऊले उचलली जायला हवीत. त्या खोऱ्यातील भारतीय बाजूला असलेल्या मार्गावर चीनचा डोळा आहे. तो मार्ग बंद करण्याच्या हालचाली चीनी सैनिक केव्हाही करू शकतात. त्याची मोठी लष्करी किंमत भारताला चुकवावी लागेल, असा इशाराही माजी संरक्षणमंत्री असणाऱ्या पवार यांनी दिला.