मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत एकत्र येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील तीन मोठे नेते एकाच व्यासपीठावर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन दिल्लीत ७ ऑगस्टला होऊ घातले आहे. या निमित्ताने ही नेतेमंडळी एकत्र दिसणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण टिकले असले तरी अनेक जिल्ह्यात ते घटले आहे. शिवाय बांठिया आयोगाने ओबीसींची दाखवलेली लोकसंख्या फारच कमी आहे, ओबीसी संघटनांच्या मते ही लोकसंख्या ५२ टक्क्यांहून अधिक आहे. त्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी पुढे येत आहे.
या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हे अधिवेशन होत असून उभय नेत्यांनी उपस्थित राहण्यास संमती दर्शवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातून ओबीसी बांधव दिल्लीत दाखल होत असून शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितले.