पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशी बोचरी टीका केली. रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबई येथे, पाकिस्तान व बांग्लादेशीय घुसखोरांना देशातून हाकलून द्या अशी मागणी करण्यासाठी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यास समर्थन देखील दर्शवलं होतं.
दरम्यान, मनसेच्या मोर्चाबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, ‘राज्याच्या राजकारणामध्ये ज्यांना महत्व आहे अशांनाच गांभीर्यानं घ्यावं सर्वांना गांभीर्याने घेऊ नये’ अशी बोचरी टीका केली. यावेळी पवार यांनी मनसेच्या महामोर्चास झालेल्या गर्दीवरून ठाकरेंना चिमटा काढताना, ‘काही लोक केवळ भाषण ऐकण्यासाठी जातात त्यामुळं अशी भाषणं ही केवळ मनोरंजनासाठी ठीक आहेत’ अशी टिपणी केली.
तत्पूर्वी, गतवर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना टीकेचं धनी केलं होतं. एखाद्या हायटेक कार्पोरेट प्रेझेंटेशनला देखील मागे सारेल अशी मांडणी असलेल्या राज ठाकरेंच्या ‘त्या’ सभांना महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला होता. राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे लोकसभा व त्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेची जवळीक पाहायला मिळाली होती. मात्र महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होऊन महविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर मनसेने आपला नवा मार्ग निवडला आहे.