ज्येष्ठ नेते शरद पवार : पावसामुळे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मतदारांशी संवाद
भोर – भाजप-शिवसेना युती सरकारने मागील पाच वर्षांत शेती, शेतकरी कष्टकरी, गरीब जनतेला छळण्याचेच काम केले आहे. जे करायला हवे होते ते न केल्याने या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. भोरमध्ये थोपटे यांचेच नेतृत्त्व प्रभावी ठरले आहे, ते महाआघाडीचे उमेदवार असल्याने त्यांना साथ द्या, अशी साद माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला.
भोर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचाराची सांगता सभा कापूरहोळ-हरिश्चंद्री येथे पार पडली. मात्र, पाऊस सुरू असल्याने शरद पवार यांनी मतदारांशी व्हिडिओ कॉन्सफरिंगद्वारे संवाद साधला या सभेसाठी भोर-वेल्हे-मुळशी तालुक्यातून पावसाची परवा न करता हजारो नागरिक सभास्थळी सकाळपासूनच उपस्थित होते. मात्र, पावसामुळे शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांना सभेस हजर राहता आले नाही.
आमदार संग्राम थोपटे यांना पवार आणि सुळे यांचा व्हिडिओ कॉल आला आणि खऱ्या अर्थाने सभा सुरू झाली. यावेळी माजीमंत्री अनंतराव थोपटे, माजी खासदार विदुराजी नवले, अशोकराव मोहोळ, माजी आमदार संपतराव जेधे, देविदास भन्साळी, कौस्तुभ गुजर, दिनकर वाव्हळ, भोर तालुका राष्ट्रवादीचेअध्यक्ष संतोष घोरपडे, वेल्हे तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, राष्ट्रवादीचे समन्वयक सुनील चांदेरे, रेवन्नाथ दारवटकर, चंद्रकांत बाठे, विक्रम खुटवड उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे लोक पक्ष नेतृत्वाचा आदर करणारे आहेत. ते आघाडी धर्म पाळणार याबाबत ठाम विश्वास आहे. एका रात्रीत शिवसेनेची उमेदवारी बदलणारी मंडळी आता मतदानाला दोन दिवस राहिले असताना नको त्या उठाठेवी करतील, नको त्या चर्चा करुन नात्यागोत्यांचे राजकारण करायला येतील. पण, राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे लोक त्यांना थारा देणार नाहीत, असा विश्वास आहे. प्रत्येकानेच आपापले गाव सांभाळलेले आहे. यामुळे कशाचीही चिंता वाटत नाही. संग्राम थोपटे, आमदार