मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असतानां एसटी कामगार कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीसाठी जोरदार संप केला होता. यावेळी संतप्त झालेल्या काही एसटी कामगारांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. या हल्ल्यातील ११८ एसटी कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने नुकताच जाहीर केला याबाबत आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाच्या विवध प्रश्नांबाबत एक बैठक आयोजित केली होती. यादरम्यान वेगवेगळ्या योजना,कर्मचाऱ्यांचे पगार यासह विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. याच बैठकीत त्या ११८ एसटी कामगारांना देखील पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय झाल्याचे समजते. याच निर्णयावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर घेण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत बोलताना पवार म्हणाले, “सरकारचा निर्णय आहे सरकारने ठरवावं,” नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी मोजक्या शब्दात या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.