मुंबई – शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे नेणारी नवी पिढी घडवणे हे आजच्या घडीचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईत यशवंतराव चव्हान प्रतिष्ठान इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ज्यांच्यापासून आणि ज्यांच्या विचारापासून शिकलो त्याचे स्मरण करणे आवश्यक आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा निव्वळ उल्लेख करुन चालणार नाही तर त्यांच्या विचाराच्यादृष्टीने आपण गेले पाहिजे.
महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विज्ञानाची कास धरत समाज घडवण्यासाठी आपले आयुष्य वेचले, आपण सगळ्यांनी याच मार्गावर चालत समाजकारण करायला हवे, असेही ते म्हणाले. आजपर्यंत दिलेल्या सहकार्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.
स्वातंत्र्यपुर्व काळामध्ये त्यावेळच्या गांधी-नेहरूंच्या विचारांची पताका घेऊन काम करण्याचे सूत्र माझ्या आईने स्वीकारले. ते काम करत असताना कौटुंबिक जबाबदारी सुद्धा कटाक्षाने पाळली पाहिजे, ही भूमिका देखील आयुष्यभर निभावली. याचा लाभ म्हणून आम्हाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन लाभला असेही शरद पवार म्हणाले.
वाढदिवसानिमित्त देशभरातून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातले मंत्री आणि कार्यकर्त्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.