नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सत्तेचा गैरवापर करुन दडपशाही शुरु आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर यश मिळणार नाही, असे म्हणत लखीमपूर घटनेवर शरद पवार संतप्त झाले. केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार हे संवेदनशील नाहीये. उत्तर प्रदेशात जालीयनवाला बागसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, देशातील शेतकरी हे कधीही विसरणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले, 2 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अडवले जाते, शेतकरी नेत्यांना रोखले जाते, हा सत्तेचा गैरवापर केला जात आहे. देशातील विरोधी पक्ष शेतकऱ्यांसोबत असेल. देशातील जनता सरकारला धडा शिकवेल. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, पण भाजपला यात यश मिळणार नाही. देशातला शेतकरी केंद्राला उत्तर देईल. केंद्र असो की राज्य सरकार, या घटनेची संपूर्ण दबाबदारी भाजपची आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा, आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच सुप्रीम कोर्टाच्या सध्याच्या न्यायमूर्तींकडून या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी देखील शरद पवारांनी केली आहे.
शेतकरी आंदोलनाविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग आंदोलन करत आहे, शांतीने आंदोलन सुरू आहे, मात्र 26 जानेवारीला त्यांच्यावर हल्ला केला गेला, ज्याच्या प्रतिक्रिया पूर्णपणे देशभर उमटल्या. लोकशाहीमध्ये शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. लखीमपूर इथं जमलेले शेतकरीही शांततेने आंदोलन करत होते, आमच्या मागण्या मांडत होते. मात्र त्यांच्या अंगावर गाडी चढवण्यात आली. ज्यात काही जणांचा मृत्यू झाला. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो.