कोल्हापूर (प्रतिनिधी) – महापुराने होत्याचे नव्हते झाले असून “तुम्ही एकटे नसून तुमच्या मागे सर्व महाराष्ट्र उभा आहे’, असा दिलासा माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिला. तसेच नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी कर्जमाफीसह आर्थिक मदतीचीही मागणी केंद्र व राज्य सरकारकडे करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पवार यांनी पूरबाधित असलेल्या करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडी, वरणगे पाडळी या गावांसह शहरातील शाहुपुरी कुंभार गल्ली, बापट कॅंप येथील पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार धनंजय महाडिक, पी. एन. पाटील उपस्थित होते.
पवार यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधत घरात ओल आली असेल तर तुम्ही राहता कुठे? अशी विचारणा केली. तेव्हा आम्ही सध्या कोल्हापूरातील बुधवार पेठेत तात्पुरते स्थलांतरीत असल्याचे पूरग्रस्तांनी सांगितले. पुरामुळे कुणाची घरे पडली आहेत त्यांनी हात वर करावा असे सांगितले. यावर बहुतांश जणांनी हात वर केले. त्यावर पवार यांनी आंबेवाडीतील लोकांचे पुनर्वसन झाले आहे, मग तिथे जायला काय अडचण आहे,अशी विचारणा केली. तेव्हा ग्रामस्थांनी त्या ठिकाणी वीज नाही, प्रॉपर्टी कार्डला नावे लागलेली नाहीत. अशा विविध कारणांमुळे स्थलांतर झाले नसल्याचे सांगितले.
ऊसाच्या स्थितीबाबतही पवार यांनी विचारणा केल्यावर येथील बहुतांश सर्वच ऊस पाण्याखाली गेल्याचे सांगण्यात आले. त्यावर उरलेल्या ऊसाबाबत आडसाळी लागवडीबाबत काय करता येईल, याच्या मार्गदर्शनासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटयुटच्या तज्ज्ञांच्या दहा टीम येथे येणार आहे. तसेच 40 हजार एकरात तयार केलेल्या ऊसाच्या बियाणाचाही वापर केला जाईल, असे पवार यांनी सांगितले. तुम्ही एकटे नसून सर्व महाराष्ट्र तुमच्या मागे आहे. त्यामुळे धीर सोडू नका, पुन्हा उभारा अशा शब्दांत त्यांनी दिलासा दिला.
पुरग्रस्तांच्यासोबत झेंडावंदन
खासदार शरद पवार यांनी 15 ऑगस्टच्या निमित्ताने पूरग्रस्त नागरिकांच्या सोबत ध्वजारोहण केले. कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगमधील पूरग्रस्त छावणीत पवारांनी ध्वजारोहण केले. या छावणीत आंबेवाडी, चिखली सिद्धार्थनगर आणि सुतार मळा या परिसरातील पूरग्रस्त नागरिक राहायला आहेत. ध्वजारोहणानंतर पूरग्रस्त महिलांनी शरद पवारांना राखी बांधली.