धरमशाला – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शांता कुमार यांनी निवडणूक लढवण्यासाठी 75 वर्षांची वयोमर्यादा असण्याच्या भाजपच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशी वयोमर्यादा असणे हा निवडणूक लढवण्यासाठीचा एक निकष असू शकतो. मात्र हा एकमेव निकष असू शकत नाही, असे शांता कुमार यांनी म्हटले आहे.
शांता कुमार हे भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. मात्र भाजपच्या सध्याच्या नेतृत्वाने लोकसभा निवडणूकीसाठी त्यांच्याकडेही दुर्लक्षच केले आहे. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन हे नेते पक्षाच्या धोरणामुळे निवडणूकीच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. त्याचप्रमाणे 84 वर्षांचे शांता कुमार हे देखील निवडणूकीतून बाद झाले आहेत.
मात्र पक्षाचा हा निर्णय आपल्याला बंधनकारक असल्याचे शांता कुमार यांनी मान्य केले आहे. पक्षाने एकदा निर्णय घेतल्यावर तो निर्णय सर्वांसाठी समान असल्याने बंधनकारक आहे, असे ते म्हणाले. तसेच आपण लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक नाही, हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.