साउदम्पटन – जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या भारताविरुद्धच्या अंतिम लढतीत संघात एकाही फिरकी गोलंदाजाला स्थान का देण्यात आले नाही, असा सवाल ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने न्यूझीलंड संघ व्यवस्थापनाला केला आहे.
या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर चौथ्या व पाचव्या दिवशी फिरकी गोलंदाजांना चांगलीच मदत मिळेल. भारतीय संघात रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा असे अत्यंत भेदक फिरकी गोलंदाज आहेत.
खेळाचे निरीक्षण केले तर चांगली मदत मिळत असल्याचे दिसत होते. मात्र, या खेळपट्टीवर न्यूझीलंड संघात एकाही फिरकी गोलंदाजाला स्थान मिळू नये याचे खूप आश्चर्य वाटते. त्यांच्याकडे मिचेल सॅन्टनरसारखा प्रतिभावान फिरकी गोलंदाज असतानाही त्याला का खेळवले गेले नाही, असा प्रश्न वॉर्नने उपस्थित केला.
सेहवागने उडवली वॉर्नची खिल्ली
खेळपट्टी कोरडी असेल तरच त्यावर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते हे वॉर्न विसरलेला दिसतो. साउदम्पटनमध्ये सातत्याने पाऊस पडत आहे अशा वातावरणात वेगवान गोलंदाजच जास्त यशस्वी ठरतात हे त्याला माहिती नसावे. कदाचित खेळपट्टी कशी असेल व त्यावर कोणत्या गोलंदाजांना मदत मिळते हेच वॉर्न विसरला असावा, अशा शब्दांत भारताचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवाग याने वॉर्नची खिल्ली उडवली आहे.