जूनच्या पहिल्या आठवड्यात एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा
सोशल मीडियावरून भावनिक आवाहन
सध्या कोणत्याही गोष्टीचा सोशल मीडियावरून लगेच प्रसार होत असल्याने शामगावकरांनी आपल्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोशल मीडियाचाच वापर केला आहे. दुष्काळी भाग असल्याने तसेच येथे कोणत्याही नोकरीच्या संधी नसल्याने अनेक युवक पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. या लोकांनाही गावातील पाणी प्रश्नासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी सोशल मीडियावरून भावनिक आवाहन करण्याचे काम गावातील युवा वर्ग करत आहे. काहीही झाले तरी यावर्षी पाणी प्रश्न सोडविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे
कोपर्डेहवेली – पिढ्यान्पिढ्या दुष्काळ सोसणारे गाव म्हणून कराड तालुक्यातील शामगावचा उल्लेख होतो. येथील पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी अनेकवेळा ग्रामस्थांनी मागणी केली. मात्र प्रशासनाने त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांसह स्थानिक राजकीय नेते गटतट विसरुन गावच्या शिवारातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकत्रित आले आहेत. येत्या पंधरा दिवसात पाण्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास जूनच्या पहिल्या आठवड्यात तहसीलदार कार्यालयासमारे संपूर्ण गाव लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
बुधवारी शामगाव येथील ग्रामस्थ, मुंबई, पुणे, येथे नोकरीनिमित्त असणारे गावचे सुपत्र यांची पाणी प्रश्नावर पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
कराड, खटाव तालुक्याच्या सीमेवरील दुष्काळी गाव म्हणून या गावची ओळख आहे. शामगावप्रमाणेच अंतवडी व मेरवेवाडी गावात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मात्र शामगावकरांनीच या प्रश्नासाठी एकजुटी केली आहे. शेजारील गावांना शेतीसाठी पाणी मिळाले आहे. मात्र शामगावला पाणी मिळालेले नाही, यांची खंत शामगावकरांना आहे. यासाठी सोशल मीडियावरून पाणी प्रश्न सोडविण्याबाबत सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूयात अशा पोस्ट व्हायरल करत लढा देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. त्यातूनच सर्वजण पाणी प्रश्नासाठी एकवटत या प्रश्नावर ग्रामसभेच्या माध्यमातून राजकारण विरहीत लढा देण्याचे ठरले.
शामगावला पाण्याची गरज असताना पाणी मिळाले नाही. शामगावपासून कृष्णा नदी फक्त वीस ते पंचवीस किलोमीटरवर आहे. टेंभू योजनेचे पाणी शाळगावच्या तलावात आले आहे. याचे अंतर शामगाव पासून चार ते पाच किलोमीटर आहे.रिसवड गावच्या शिवारातून गेलेल्या कॅनॉलचे शामगाव पासून सहा ते सात किलोमीटर अंतर आहे. एवढ्या जवळ पाणी आले असताना फक्त आपल्याच गावाला पाणी नाही याची खंत शामगावकरांना वाटू लागली. त्यासाठीच पाणी प्रश्न चर्चेत आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाणी प्रश्नासाठी नियोजन कसे करता येईल, हा प्रश्न संपूर्ण गावाचा आहे.हा लढा लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष यांच्या विरोधात नाही तर शासनाच्या विरोधात आहे. अहिंसेच्या मार्गाने हा लढा लढण्याचे ठरले. या बैठकीप्रसंगी भिमराव डांगे यांनी तांत्रिक योजनेची माहिती सांगितली. गावातील प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याच्या प्रश्नासंदर्भात एकजूट दाखवावी. उद्योजक सुरेश पोळ यांनी सांगितले गावात पाण्याच्या जागृतीसाठी काही दिवस प्रभागवार बैठका घेण्यात येतील, असे सांगण्यात आले.
निवृत्ती डांगे म्हणाले, आता माघार नाही. आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागत आहोत. त्यामुळे त्यांना आमचा प्रश्न सोडवावाच लागेल. अन्यथा आंदोलनासाठी तयार रहावे, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी कराड पंचायत समितीचे माजी सदस्य भिमराव डांगे, माजी उपसरपंच धोंडिराम पोळ, भानुदास पोळ. निवृत्ती डांगे, उद्योजक सुरेश पोळ, बाळासाहेब पोळ, शिवाजी पाटील, बंडा पोळ, उद्धव पोळ, प्रल्हाद पाटील, जीवन पोळ, महेंद्र जाधव, सुनील गायकवाड, सुभाष पोळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पाणी प्रश्न हा आमच्या गावाचा ज्वलंत प्रश्न आहे. आणखी किती दिवस दुष्काळाच्या झळा आम्ही सोसायच्या. आमच्या शेजारी गावांमध्ये विपुल प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. मात्र शामगावमध्ये नाही. पाण्याविना येथील शेती वाया जात आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून फक्त त्याकडे बघत बसण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही. आमच्या हक्काचे पाणी आम्ही मिळवणार आहोत.
शीतल गायकवाड, सरपंच