जयपूर : मध्यप्रदेशात भाजपकडून पैशाच्या ताकदीच्या आधारे निर्लज्ज घोडेबाजार केला जात असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. देशात सत्ताधारी असलेल्यांकडून लोकशाहीची हत्या केली जात आहे आणि सर्व देश त्यांना धडा शिकवेल, असे गेहलोत म्हणाले.
मध्यप्रदेशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर कॉंग्रेस आमदारांना जयपूरला हलवण्यात आले आहे. या आमदारांना विमानतळावरून नेण्यासाठी आले असता पत्रकारांशी ते बोलत होते.
मध्यप्रदेशात निर्लज्जपणे आमदारांचा घोडेबाजार केला जात आहे आणि तेथे आमदारांना धमकावले जात आहे. हे सर्व पैशाच्या जोरावर केले जात आहे. म्हणूनच आमदारांना मध्यप्रदेशातून राजस्थानात हलवले आहे.
येथे आम्ही सर्वजण एकत्र आहोत. इलेक्ट्रोरल बॉन्डच्या नावाखाली देशात मोठा घोटाळा केला जात आहे. लोकांना “ईडी’ आणि “सीबीआय’ची भीती दाखवून लुटले जात आहे. हे आपण पुन्हा पुन्हा सांगत आलो आहोत, असेही गेहलोत म्हणाले.
सरकारचे मुख्य प्रतोद महेश जोशी, उपप्रतोद महेंद्र चौधरी आणि राजस्थानचे परिवहन मंत्री प्रताप सिंह यांच्यासह अन्य कॉंग्रेस नेतेही विमानतळावर उपस्थित होते.
मध्यप्रदेशच्या आमदारांना दिल्ली- जयपूर महामार्गावरील रिसॉर्टवर नेण्यासाठी तीन लक्झरी बसची व्यवस्थाही करण्यात आली होती. या आमदारांना दोन रिसॉर्टवर ठेवण्यात आले आहे.