राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर देखील वेगवान घडामोडी सुरूच आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना नव्या चिन्हाची तयारी ठेवा असं आवाहन केलं आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात शिवसेनेच्या अस्तित्वाबाबतची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार शंभूराजे देसाई यांनी उद्धव ठाकरेंची भूमिका आणि आगामी राजकीय परिस्थिती यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाष्य केलं आहे.
आमचं बंड नाही तर आम्ही उठाव केला. दोन तृतियांश लोकप्रतिनिधींनी उठाव केल्यामुळे आम्हीच मूळ शिवसेना आहोत. त्यामुळे शिवसेनेचं चिन्ह हे आमचंच आहे, असं शंभूराजे देसाई म्हणाले. उद्धव ठाकरेंनी चिन्हाबाबत जे वक्तव्य केलं आहे त्याचा अर्थ असा आहे की,त्यांची देखील खात्री पटलेली आहे की आम्हीच मूळची शिवसेना आहोत असही देसाई यावेळी म्हणाले.
काय म्हणाले नेमकं उद्धव ठाकरे
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना नव्या चिन्हाची तयारी ठेवा असं आवाहन केलं आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात शिवसेनेच्या अस्तित्वाबाबतची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यातच कोणीही गाफील राहू नका आणि गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केल्याने पुढची लढाई सोपी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेची पुढील लढाई तितकी सोपी असणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपसह शिंदे गटाचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे तर शिवसेनेचे राज्यात काय अस्तित्व असणार हे देखील सिद्ध होणार आहे.