मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी शिंदे सरकारवर टीका करताना “हे सरकार लवकरात लवकर घालवलं नाही, तर महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे राज्यातील हस्तक राहणार नाहीत, असे म्हटले होते. दरम्यान, संजय राऊतांच्या या टीकेला आमदार शंभूराज देसाई यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
शंभूराजे यांनी उत्तर देताना, “संजय राऊतांना सध्या भडकाऊ विधानं करणं एवढंच काम आहे. संजय राऊत महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर किती दिवस जेलमध्ये होते? हे त्यांनी एकदा सांगावं. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं आहे, की ज्यावेळी शिवसेनेने आंदोलन केले, तेव्हा तिथे ४० दिवस आम्ही जेलमध्ये होतो. संजय राऊत चार तासतही जेलमध्ये राहिले आहेत का”, असे प्रत्युत्तर शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांना दिले आहे.
तसेच पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “एसी चेंबरमध्ये बसून केवळ भडक विधानं करायची आणि सरकार टीका करायची एवढंच काम सध्या संजय राऊतांकडे आहे. तीन महिने ते जेल मध्ये होते, तेव्हा महाराष्ट्रात शांतता होती. आता त्यांचे दर्शन सकाळी सकाळी होते, त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण आता बिघडायला लागले आहे”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांनी,”महाराष्ट्रात जे सरकार आलं आहे, त्यामुळे अनेक राजकीय दरोडेखोरांना आपण महाराष्ट्राचे लचके तोडू शकतो, असं वाटत आहे, हे सरकार लवकरात लवकर घालवलं नाही, तर महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे राज्यातील हस्तक राहणार नाहीत,” असे ते म्हणाले होते.