सातारा -महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी होती. ती आमच्यासाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता. शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना जास्त निधी याविषयी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या. मात्र, त्यांनी आमचे म्हणणे फारसे गांभीर्याने घेतले नाही. अडीच वर्षात आमच्या आमदारांना आणि शिवसैनिकांना त्रास झाला. सर्व काही अगदी सहनशीलतेच्या पलीकडे गेल्याने आम्ही चाळीस आमदारांनी एकत्रित उठाव केला. यापुढे जिल्ह्यातील चार आमदारांची संख्या निश्चित वाढवून दाखवू. शिंदे गट आणि भाजप ही युती नैसर्गिक असून पुढील अडीच वर्षात महाराष्ट्राचा निश्चित विकास होणार, असा ठाम दावा आमदार शंभूराजे देसाई यांनी केला.
माजी मंत्री शंभूराज देसाई आज जिल्ह्यात दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ते पाटण मतदारसंघात मदतीसाठी दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर देसाई यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आम्ही मतदारसंघातील जनतेच्या मदतीसाठी दाखल झालो आहोत. आमच्या 40 आमदारांचे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात स्वागत होत आहे. त्यामुळे शिवसैनिक आमच्यासोबत आहेत हे स्पष्ट होत आहे.’ गुवाहाटीला 40 रेडे पाठवलेत या संजय राऊत यांच्या टीकेविषयी “40 रेडे काय करू शकतात याची प्रायश्चित्त त्यांना भोगावे लागले आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांच्या विधानांना किंमत देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी अडीच वर्षाच्या काळात जिल्ह्याचा धडाकेबाज विकास करण्याचे निश्चित केले असून जिल्ह्याने फक्त मागायचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यायचे इतकेच काय ते शिल्लक आहे, असे देसाई यांनी सांगितले. जिल्ह्यातील शिवसेना व भाजपचे चारही आमदार व दोन खासदार आम्ही एकत्र काम करणार आहोत. पालकमंत्री पदाबाबत ते म्हणाले, “मी कोणतेही मंत्रिपद मागितलेले नाही. काही कारणानिमित्त मी मुंबईत होतो.
काही आमदार मंत्रिपदासाठी विनंती करत होते. पण या कोणत्याही विषयावर माझी एकाही ओळीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली नाही.’ महाविकास आघाडीसंदर्भात ते म्हणाले, “ज्यांच्याविरोधात आम्ही मते मागितली होती. त्यांच्याबरोबरच मांडीला मांडी लावून सत्तेत बसणे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता. साहेबांनी ही आघाडी स्वीकारली त्यामुळे आमची अडचण झाली. मात्र, आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये नामधारीच असे होतो. आमच्या अधिकार वृद्धीसंदर्भातही आम्ही बोललो होतो. मात्र, त्याकडे फारसे गांभीर्याने बघण्यात आले नाही. आमच्या मतदारसंघातील आम्ही सुचवलेल्या कामांचेही राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांनी उदघाटने केली. हा हस्तक्षेपही आम्हाला उघड्या डोळ्यांनी पाहावा लागला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. शिवसैनिकांना प्रचंड त्रास झाला या सर्व बाबी सहनशीलतेच्या पलीकडे गेल्याने आम्ही उठावाचा निर्णय घेतला. आगामी काळात पुढील अडीच वर्ष शिवसेना- भाजप आम्ही एकत्र राहून जिल्ह्यातील चार आमदारांची संख्या नक्की वाढवू, असा विश्वास यांनी व्यक्त केला.