कारखान्याबाबत कोणाकोणाकडे आर्थिक मागणी केली हे जनतेला कळले पाहिजे
कोरेगाव: जरंडेश्वर साखर कारखान्याची केस टाकताना आपण अजित पवार यांना काय म्हणाला होता, हे एकदा जनतेसमोर सांगा. कारखान्याबाबत आपण कोणाकोणाकडे आर्थिक मागणी केली होती आणि केस मिटवतो असे सांगितले होते, हे एकदा जनतेला कळाले पाहिजे. दबावतंत्राचा वापर करत आर्थिक फायद्यासाठी डॉ. शालिनीताई पाटील टीका करत आहेत, असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.
डॉ. पाटील यांनी अजित पवार व शशिकांत शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यावर आमदार शिंदे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, “”निवडणुका आल्या की जाणीवपूर्वक माझ्यावर टीका करायची आणि माझ्याबद्दल संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष असताना ताई कोरेगावातून पक्षाच्या चिन्हावर उभ्या राहिल्या. त्यावेळच्या सर्व घडामोडींवेळी ज्येष्ठ म्हणून त्यांचा आदर करुन एक सहकारी या नात्याने विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर त्यांना मदत करत होतो. आमच्या दोघांचे चांगले संबंध होते. त्या मला चांगल्या प्रकारे मानायच्या देखील.
शशिकांत शिंदे चांगले अभ्यासपूर्वक बोलतो, राजकारणात चांगले भवितव्य आहे, असे त्या नेहमी म्हणत आर्शिवाद देत असत. जरंडेश्वर कारखान्याचा माझा काहीही संबंध नसताना ताईंनी केलेल्या मागणीप्रमाणे आताचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व काही पदाधिकारी माझ्याकडे आले होते आणि मी त्यांना निस्वार्थीपणे आर्थिक मदत केली. त्यातील काही रक्कम आजही मिळालेली नाही. मी त्याची मागणी देखील केली नाही. त्यावेळी मी त्यांचा आदर ठेवूनच मदत केली, ती माझी संस्कृती आहे.”
कोरेगाव तालुका शरद पवार यांना मानणारा आहे. त्यांच्यामुळेच त्या दोनवेळा आमदार झाल्या. पवार यांच्याविरोधात जाऊन खालच्या पातळीवर बोलल्या, हे योग्य नव्हते. कोरेगाव तालुक्यातून दोन वेळा आमदार होण्याचा ताईंचा प्रयत्न फसलो, याचा विसर त्यांना पडला. तत्कालिन खासदार लक्ष्मणराव पाटील व श्रीनिवास पाटील यांनी पवार यांच्याकडे शब्द टाकल्याने त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. पक्षाने त्यांना संधी दिल्यामुळेच त्या आमदार झाल्या, याचा विसर त्यांना पडला असावा किंवा जाणीव राहिलेली नसेल. त्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळेच त्यांना संधी न देता मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पक्षाने मला कोरेगावातून संधी दिली आणि त्यांचा पराभव झाला. हा पराभव त्यांनी खिलाडू वृत्तीने स्वीकारायला हवा होता, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
जरंडेश्वर कारखाना कसा चालवायचा, हा त्यांचा प्रश्न होता. आज ज्या पध्दतीने कारखानाच चालला आहे, तसा त्यावेळी चालला असता तर लिलाव होण्याची वेळ आली नसती, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले, “”जरंडेश्वर कारखाना आर्थिक अडचणीत येण्यास दुसरे कोणी कारणीभूत नसून ताईच आहेत. राज्यातील इतर कारखाने भाडेतत्वावर व्यवस्थित चालविले गेले, मात्र जरंडेश्वर चालविला गेला नाही. तुमच्या आर्थिक तडजोडीसाठी मातब्बर कारखानदारांनी कारखाना सोडला. जे कारखानदार कारखाना चालवत होते, त्यांचे राज्यात चांगले राजकीय वजन आणि ताकद होती. त्यामुळे स्वतःच्या चुका लपविण्यासाठी दुसऱ्यावर बोलण्याचा त्यांचा खटाटोप आहे.
ताईंना शेतकरी आणि कामगारांविषयी चिंता नाही. त्यांनी आजवर कारखाना स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आर्थिक फायद्यासाठीच चालविला. त्यांनी कर्जाचा डोंगर कामगार आणि तोडणी वाहतूकदारांवर उभा केला असून, आजही त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. चुकीच्या कारभाराचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडण्याचे काही कारण नाही. ज्यावेळी कारखान्याचा लिलाव झाला, कारखान्याचा लिलाव हा चुकीच्या कारभारामुळेच झाला आहे. तुम्ही न्यायालयात गेला, तेथे तुम्हाला तीन वेळा संधी दिली, मात्र तुम्ही कर्ज भरण्यास असमर्थता दर्शविल्याने कारखान्याचा लिलाव झाला. कारखाना कोणी घेतला, याच्याशी माझा काही एक संबंध नव्हता. त्याबाबत मला कल्पना देखील नव्हती. त्यावेळी मी कोरेगावचा आमदार नव्हतो.”
कोरेगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षात प्रचंड प्रमाणात ऊसाचे उत्पादन झाले आहे. 2500 मेट्रीक टन क्षमतेचा कारखाना आता 7 हजार टनापेक्षा जास्त क्षमतेचा झाला आहे. ऊसाचे गाळप वेळेत झाले पाहिजे, शेतकर्यांना दर मिळाला पाहिजे, यासाठी मी कारखान्यावर मोळी टाकण्यासाठी जातो. कारखान्याकडून शेतकर्यांना चांगला दर मिळतो, वेळेत ऊस तोड होते, याचे निश्चितपणे समाधान आहे. कारखान्यातील एक पोतेदेखील मी आणले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्योग मंत्र्यांनी पुसेगावची फाईल अडवली
पुसेगाव येथे फाईव्ह स्टार एमआयडीसी उभारण्याच्या निर्णयावर आजही मी ठाम आहे. कण्हेर धरणातून त्यासाठी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मान्यतेविषयी निर्णय घेतलेला नाही. विधीमंडळ अधिवेशनाबरोबरच मी दोनदा त्यांच्या बैठक घेतली होती, मात्र त्यांनी निर्णय घेतला नाही. ताईंनी याबाबत माहिती घेऊनच बोलावे, असे त्यांनी सांगितले.
सांगलीला पाणी पळविताना का गप्प होता
डॉ. शालिनीताई पाटील या राज्य मंत्रिमंडळात जबाबदार मंत्री म्हणून काम करत होत्या. त्यावेळी त्यांना कोरेगाव तालुक्याचे हित आठवले नाही. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी सातारा जिल्ह्याचे पाणी सांगलीला पळविले, त्यावेळी ताई काय करत होत्या? त्यावेळी त्यांना कोरेगावच्या पाण्याची आठवण झाली नाही का, असा सवालही शिंदे यांनी केला. धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उभारणीवेळी आणि पाणीवाटपावेळी ताईच कोरेगावच्या आमदार होत्या. त्यावेळी त्यांना कोरेगावच्या पाण्याची आठवण झाली नाही, असे सांगून शिंदे म्हणाले, “”माझ्या माहितीप्रमाणे सातारा जिल्ह्याचे पाणी बारामतीला जात नाही, त्यामुळे ताईंनी व्यवस्थित माहिती घेऊन बोलण्याची गरज आहे. धोमचे हक्काचे पाणी कोरेगाव तालुक्याला मिळावे, यासाठी मी आणि आमदार बाळासाहेब पाटील प्रयत्नशील आहोत. अपरिहार्य कारणामुळे एका बैठकीस उपस्थित राहिलो नाही, याचा अर्थ पाणी पळविण्यास आमची मूक संमती आहे, असे होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.