मुंबई: करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने मंदिरे न उघडण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिरे उघडली नाहीत, तर मनसे घंटानाद आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आणखी काही करा, पण आमचा नाद करू नका, असे प्रत्युत्तर दिले होते. मात्र, मनसेकडून आता यावर पलटवार करण्यात आला आहे.
घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा आमचा नाद करू नका. राजकीय पोळ्या भाजून घेणारे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो, असे दाखवतात. मात्र, भावनेचा नाही तर लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढतो, तेव्हा हे सगळे बीळात जाऊन लपतात, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला होता. यावर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी पलटवार केला आहे.
नाद करण्यासाठी अगोदर स्वतःची हिंदुत्वाची भूमिका ठाम असावी लागते, पण सत्ता मिळाल्यानंतर हिंदुत्वाची भूमिका बद्दलणाऱ्याची घंटा तर निवडणूकीत जनताच वाजवल्याशिवाय राहणार नाही…!!!#नादकरापणआमचाकुठं#मुंबईमहापौर#किशोरीपेडणेकर
— Shalini Thackeray (@ThakareShalini) August 31, 2021
नाद करण्यासाठी अगोदर स्वतःची हिंदुत्वाची भूमिका ठाम असावी लागते, पण सत्ता मिळाल्यानंतर हिंदुत्वाची भूमिका बद्दलणाऱ्याची घंटा तर निवडणूकीत जनताच वाजवल्याशिवाय राहणार नाही…!!!, असे ट्विट शालिनी ठाकरे यांनी केले आहे.
जनआशीर्वाद यात्रा झालेली चालली. सण आला की लॉकडाऊन. म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांना जे हवेय तेवढे वापरायचे आणि बाकीचे बंद करुन इतर जनतेला घाबरून ठेवायचे. त्यामुळे उत्सव साजरा करा, असे सांगितले. लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे. सर्व गोष्टी सुरू आहेत, मात्र दुसरी, तिसरी लाट सांगत घाबरवले जात असून, सर्व गोष्टी सुरु असतात मग सणांवरच का येता? तसेच मंदिरे उघडली नाहीत तर मनसे घंटानाद आंदोलन करणार असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.