टॉंटन – वेस्ट इंडिजकडे भेदक गोलंदाज असूनसुद्धा आम्ही आत्मविश्वासाने खेळलो, त्यामुळेच आम्हाला सनसनाटी विजय मिळविता आला. या विजयात माझ्या शतकाचा वाटा होता. माझ्यासाठी हा कारकिर्दीतील संस्मरणीय क्षण आहे असे बांगलादेशचा अनुभवी फलंदाज शकीब अल हसन याने सांगितले.
बांगलादेशने 322 धावांचे लक्ष्य केवळ तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. त्यामध्ये शकीब याने नाबाद 124 धावा करीत मोलाची कामगिरी केली. लिट्टन दास याने नाबाद 94 धावा करीत त्याला उत्तम साथ दिली. धावांचे लक्ष्य साध्य करण्याबाबत बांगलादेशने पराक्रम केला. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध आयर्लंडने 329 धावाचे लक्ष्य साकार केले होते.
सामना झाल्यानंतर शकीब म्हणाला की, आम्हाला नेहमीच लक्ष्य गाठणे आवडते. वेस्ट इंडिजकडे अतिशय प्रभावी गोलंदाज आहेत. याची पूर्ण कल्पना असल्यामुळे सुरुवातीला सावध खेळ करण्यावर आम्ही भर दिला. जेव्हा आम्ही क्षेत्ररक्षण केल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परत आलो, त्यावेळी आमच्यावर कोणतेही दडपण नव्हते. आपण हे लक्ष्य गाठणार अशीच सर्व खेळाडूंना खात्री होती. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा प्रभाव कमी केल्यानंतर धावांचा वेग वाढविण्याचे आमचे नियोजन होते. त्यानुसार आम्ही संघास विजयपथावर आणले. त्यानंतरच दास याने आक्रमक पवित्रा घेतला. आमच्या सलामीच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. तेथूनच आमचा आत्मविश्वास वाढत गेला. शकीब याने या स्पर्धेत इंग्लंडविरुद्धही शतक केले होते.