संतोष पवार
शाहूपुरीत सार्वजनिक शौचालयांचा अभाव
ग्रामपंचायतीत मुलभूत सुविधा मिळत नसल्याने नाराजी
सातारा – सातारा शहरालगतची मोठी ग्रामपंचायत, महसूल व मोठा विस्तार, अशी शाहूपुरी ग्रामपंचायतीची ओळख असली तरी शाहूपुरीकरांना मूलभूत सुविधा देण्यात ग्रामपंचायतीला फारसे यश आल्याचे दिसत नाही. ज्या प्रमाणात महसूल मिळतो, त्या तुलनेत नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे सातारा नगरपालिकेच्या हद्दवाढीत शाहूपुरीचा समावेश व्हावा, अशी भूमिका अनेक नागरिकांनी घेतली आहे. शाहूपुरीकरांना आता हद्दवाढीची प्रतीक्षा असून नगरपंचायतीची मागणी पिछाडीवर पडली आहे. याबाबत सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून लागले आहे.
सातारा जिल्ह्याने निर्मल ग्राम, हागणदारीमुक्त ग्राममध्ये देशात नावलौकिक मिळवला असला तरी शहरालगतच्या शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. गटारगंगा उघड्यावर वाहत असल्याने रोगराई पसरण्याची भीती आहे. शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत एकही सार्वजनिक शौचालय नाही. वास्तविक केंद्र व राज्य सरकार शौचालयांसाठी लाखो रुपयांचे अनुदान देत असताना शाहूपुरीसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीने शौचालयांसाठी पुढाकार का घेतला नाही, याची चर्चा महिला वर्गात आहे.
शाहूपुरीत अनेक नव्या वसाहती उदयास आल्या. लाखोंचा महसूल वाढला. मात्र, शाहूुपुरीची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी कोणीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही. 40 हजार लोकसंख्येच्या शाहूपुरीत अद्याप भाजी मंडई नाही, ही न पटणारी गोष्ट आहे. मुख्य चौकालगत सोसायटीच्या खासगी जागेत व मोळाचा ओढा परिसरात भाजी मंडई भरते. स्वतंत्र भाजी मंडईसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्यास स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायतीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
भाजी मंडईला जागाच सापडेना
शाहूपुरी ग्रामपंचायतीचा विस्तार गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याने लोकसंख्या 40 हजारांवर पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. शाहूपुरीत वसाहती वाढल्याने सेवा पुरवण्यात ग्रामपंचायत कमी पडत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांसाठी शाहूपुरीकरांना झगडावे लागत आहे. वास्तविक ग्रामपंचायतीचा महसूल वाढला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे 14 व्या वित्त आयोगाचा सर्वाधिक निधी मिळवणारी ग्रामपंचायत म्हणून शाहूपुरीची ओळख आहे. त्या तुलनेत विकासकामे म्हणावी अशी झालेली दिसत नाहीत. सत्तासंघर्ष, श्रेयवादामुळे विकासाला ब्रेक बसल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
काही नागरिकांचा कल सातारा नगरपालिका हद्दवाढीच्या बाजूने आहे तर काही नागरिकांना नगरपंचायत व्हावी, अशी अपेक्षा आहे. नगरपंचायत झाल्यास शाहूपुरीकरांचे वेगळे अस्तित्व राहील, ही त्या मागची भावना आहे. सातारा पालिका हद्दवाढीत शाहूपुरीचा समावेश झाल्यास विकास होईल, अशाही प्रतिक्रिया आहेत. माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शाहूपुरी ग्रामपंचायतीचा सातारच्या हद्दवाढीत समावेश व्हावा, अशी भूमिका कायम घेतली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हद्दवाढीची घोषणा केली होती. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अद्याप सातारच्या हद्दवाढीचा विषय पुढे आलेला नाही. मात्र, शाहूपुरीतील जनतेलाच सातारच्या हद्दवाढीची अपेक्षा आहे.