मुंबई – रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी एका जातीत अडकलेली सत्ता सर्व जातीत पोहचवली. त्यानंतर त्यांचाच वारसा पुढे चालवून जातीअंताची लढाई करून या सत्तेचा वाटा आरक्षणामार्फत दलित, बहुजनाला दिला व समतेचा लढा उभारला त्या शाहू महाराजांचे हे स्मृतीवर्ष आहे. आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांचं स्मृतीशताब्दी वर्ष कृतज्ञता वर्ष म्हणून पाळणार असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी म्हटले आहे.
पुढे खरात म्हणाले की, शाहू महाराजांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विचारातून आणि कृतीतून सहकार्य केले. त्यामुळे तमाम आंबेडकरी समाज आणि भारतातील बहुजन समाज कायम कृतज्ञ राहील.
शाहू महाराज माणगाव सभेत म्हणाले होते की, भीमराव आंबेडकर यांच्या रूपाने तुम्हाला तुमचा नेता मिळाला. भारतात एक दिवस असा येईल की डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे सर्वश्रेष्ठ नेते असतील. आज शाहू महाराज यांचे स्वप्न साकार झाले. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण विश्वाचे महानायक, विश्वरत्न सर्वश्रेष्ठ महामानव झाले आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष शाहू महाराज यांचे स्मृतीवर्ष कृतज्ञता वर्ष म्हणून पाळेल.