पिंपरी – वादाचे कारण कोणतेही असो, अलीकडच्या काळात चाकू, कोयता किंवा धारदार शस्त्रांसोबतच थेट पिस्तुलांचा वापर प्रतिस्पर्ध्याचा “गेम’ करण्यासाठी होऊ लागला आहे. पूर्वी केवळ परवानाधारक व्यक्तींकडेच असणारे पिस्तूल हे अलीकडे नवख्या गुन्हेगारांच्या हातात पोहोचले आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात गोळीबारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून अनेकांचा “गेम’ही झाला आहे. गेल्या वर्षभरात 58 गुन्ह्यांमध्ये 67 पिस्तुले हस्तगत करण्यात आल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
गेल्या काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहर हे टोळीयुद्ध व संघटित गुन्हेगारीसाठी ओळखले जाऊ लागले आहे. बहूसंख्या टोळीतील म्होरके सध्या मोक्कामध्ये तुरूंगात असले तरी गल्लीबोळातील स्वयंघोषित भाई, नवखे युवक मद्य व गांजाच्या आहारी गेल्याने गुन्हेगारी विश्वात ओढले जात आहेत. काहींच्या उपजिविकेचे साधनही ‘पिस्तुल’च बनले आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासारखे दमदार अधिकारी असल्याने पोलिसांवर पूर्वीप्रमाणे राजकीय दबाव नाही.
तसेच कारवाईसाठी पोलीस अधिकाऱ्यांना थेट पोलीस आयुक्तांचे पाठबळ असूनही गुन्हेगारांची पाळेमुळे का खोदली जात नाहीत, अशी चर्चा शहरात सुरू आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून शहरातील नागरिकांना धमकाविले जात आहे. पिस्तुलाच्या जोरावर मालमत्ताही ताब्यात घेण्याचे प्रकार अलीकडच्या काळात घडले आहे. भाईशी “पंगा’ नको म्हणून अनेक जण पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस दाखवत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी खुलेआम सराईत गुन्हेगार घातक शस्त्रे बाळगून फिरतात. हिंजवडीतही कुख्यात गुंडाने प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडाला पिस्तुलाचा धाक दाखविला.
शस्त्र विरोधी पथकाची स्थापना
पिंपरी-चिंचवड शहरासह आयुक्तालयाच्या हद्दीत गोळीबार आणि त्यातून खून होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याची गंभीर दखल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. या घटनांना आळा घालण्याबरोबरच आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेत शस्त्र विरोधी पथकाची स्थापना नुकतीच केली आहे. या पथकाला एक पोलीस निरीक्षक व कर्मचारीही देण्यात आले आहेत. लवकर या पथकाचे काम सुरू होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.