नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधील शाहीन बागमध्ये नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) आणि एनआरसीच्या विरोधात जवळपास दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिंकावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकांमध्ये दिल्लीला नोएडाशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता आंदोलनामुळे बंद आहे आणि त्यामुळे सामान्य लोकांची गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारकडे अनेक प्रश्नांची उत्तरे मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने याविषयी, ‘आंदोलनामुळे सामान्य लोकांना समस्यांचा सामना करावा लागू नये आणि सार्वजनिक रस्ते बंद करणे योग्य नाही.’ असे म्हटले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये नोएडाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांपैकी एक रस्ता आंदोलनकर्त्यांकडून अडवण्यात आला आहे. याचिकेमध्ये नमूद करण्यात आल्यानुसार, रस्ता बंद केल्यामुळे दररोज लाखो लोकांना समस्यांचा सामना करावा लागतो. याचिकेमध्ये आंदोलनकर्त्यांचं नेतृत्व करणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्याचे आदेश देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच त्यांचा संबंध कोणत्याही राष्ट्रविरोधी संघटनेशी नाही, हे तपासून पाहाण्याचीही मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे.
सीएए आणि एनआरसीच्या विरोधात शाहीन बागमध्ये जवळपास दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना आदेश दिले होते. त्यानुसार, दिल्ली पोलिसांच्या अमन कमिटीने लोकांशी बऱ्याचदा चर्चा केली. परंतु, त्यातून कोणताच मार्ग निघाला नाही. आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे.