मुंबई – शिंदे गटाचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्यात नवीन सरकार आल्यापासून विरोधकांवर खोचक शब्दांत टोलेबाजी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. अश्यातच आता पुन्हा एकदा शहाजीबापू पाटील यांनी एक मोठं वक्त्यव्य केलं असून, त्यांचं हे वक्त्यव्य सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “एखाद्या फाटक्या माणसाकडून आम्ही तुमचा पराभव करुन दाखवू’ अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. वृत्तवाहिन्यांशी बोलत असताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या आव्हानांवर बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, “आदित्य ठाकरे यांनी लवकरच राजीनामा द्यावा आणि मंजूर करुन घ्यावा. त्यांनी टीव्हीवर आव्हान देऊ नये. पटकन राजीनामा लिहायचा आणि राज्यपालांकडे द्यायचा. मग मैदानात उतरण्याचे आव्हान द्यावे. आम्ही एखाद्या फाटक्या माणसाकडून त्यांचा पराभव करु दाखवू”. असं ते म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या आव्हानानंतर शिंदे गटातील अनेक नेत्यांनी आदित्य यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रातील 13 खासदार आणि 40 आमदारांनी गद्दारी केली. पण त्या सर्वांना मी आजही चॅलेंज देतो. तुम्ही तुमच्या आमदारकी, खासदारकीचा राजीनामा द्या. त्यानंतर पुन्हा निवडून येता का ते पाहा. मी तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देखील चॅलेंज दिलं आहे. मी वरळीमधून राजीनामा देतो. तुम्ही माझ्याविरोधात वरळीतून उभे राहा. मग पाहू तुम्ही कसे निवडून येता? असे आव्हान आदित्य ठाकरेंनी दिले होते.