नवी दिल्ली -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शक्तिशाली सुरक्षाविषयक समितीमध्ये दोन नवे चेहरे दिसणार आहेत. यावेळी ते अरूण जेटली आणि सुषमा स्वराज यांची जागा घेतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षाविषयक समितीमध्ये गृह, संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे शहा आणि जयशंकर यांना त्या समितीमध्ये स्थान मिळेल. याआधी परराष्ट्र सचिव असताना समितीला माहिती पुरवण्याचे काम जयशंकर यांनी अनेकदा केले. आता ते त्याच समितीचे घटक बनणार आहेत. यावेळी राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारामन् यांची खाती बदलली असली तरी त्यांचे स्थान अबाधित राहिले आहे.
मागील वेळी राजनाथ यांच्याकडे गृह तर सीतारामन् यांच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी होती. यावेळी त्यांच्याकडे अनुक्रमे संरक्षण आणि अर्थ खात्यांची धुरा सोपवण्यात आली आहे. संरक्षण धोरण आणि अंतर्गत सुरक्षा यांसारख्या देशाच्या सुरक्षेशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सुरक्षाविषयक समितीला आहे.