शहर निरोगी ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थी नक्की पार पाडतील
पुणे – “प्लॅस्टर ऑफ पॅरिस’चा वापर केलेल्या गणेश मूर्ती बनवायला सोप्या असतात, त्या सुबक दिसतात आणि त्याच्या किंमतीही कमी असतात. मात्र, या मूर्ती नदीमध्ये विसर्जित केल्याने नदी प्रदूषित होते. त्यामुळे मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे गरजेचे आहे. परंतु, केवळ मूर्ती इको-फ्रेन्डली असूनही उपयोग नाही; तर त्यांना आवश्यक असणारी सजावट पर्यावरणपूरक असणे आवश्यक आहे. त्यासाठी नैसर्गिक आणि घरगुती वस्तूंचा वापर केला पाहिजे, असा संदेश महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी “दै. प्रभात’तर्फे आयोजित “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या कार्यक्रमात दिला.
“माणिकचंद’ प्रस्तुत “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन महापौरांच्या हस्ते टिळक रस्त्यावरील “डीईएस सेकंडरी स्कूल’ येथे मंगळवारी झाले. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक, “महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे विभागीय अधिकारी दिलीप खेडकर, ज्येष्ठ उद्योजक आणि “माणिकचंद’चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश धारिवाल, “सिद्धीविनायक ग्रुप’चे राजेश सांकला, “पास्को एन्व्हायर्मेंटल सोल्युशन्स’च्या अंजली मुळे, “महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड’चे आशुतोष पत्राले, “जेनसिस ऍडव्हर्टायजिंग’चे संजय साताळकर, दै. “प्रभात’चे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, कार्यकारी संपादक अविनाश भट, ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे आदी उपस्थित होते. उपस्थितांचा दै. “प्रभात’च्या वतीने शाल, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
शहर निरोगी आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी गणेशोत्सवामध्ये सर्वांनी “प्लॅस्टिक’ आणि “थर्माकोल’चा वापर टाळला पाहिजे. हे मोठे काम आहे. पण मला खात्री आहे, विद्यार्थी ही जबाबदारी नक्की पार पाडतील, असे महापौर म्हणाल्या.
“प्रभात ग्रीन गणेशा’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक सुबक गणेश मूर्ती साकाराव्यात. तुमच्या कलात्मक मूर्तींनी आपल्या शाळेचे नाव सगळीकडे पोहोचणार आहे, असा विश्वास व्यक्त करत डॉ. कुंटे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
“प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीमुळे नदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये अधिकाधिक नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली पाहिजे. त्याचबरोबर मूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदासह घरी बादलीमध्ये केले पाहिजे. बादलीमध्ये “अमोनियम बायकार्बोनेट’ ही पावडर वापरून मूर्तीचे विघटन करता येते, असे ज्ञानेश्वर मोळक म्हणाले.
ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे, रस्त्याच्या कडेला कचरा न करणे आणि वाहतुकीचे नियम पाळणे, या तीन गोष्टींची अंमलबजावणी सर्वांनी केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
दै. “प्रभात’चे कार्यकारी संपादक अविनाश भट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी “प्रभात ग्रीन गणेशा’ या उपक्रमामागील भूमिका मांडली. त्याचबरोबर स्वच्छता आणि पर्यावरण हे विषय केवळ महापालिकेचे नाहीत; तर सर्व नागरिकांनी यामध्ये सकारात्मकतेने सहभाग घेतला पाहिजे. ज्या गणपतीची आपण मनोभावे पूजा करतो, त्या मूर्तीचे विसर्जनानंतरचे चित्र वेदनादायी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यापुढे स्वता हाताने बनवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपल्या घरी करावी, असे आवाहन भट यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास वारुंजीकर यांनी केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ही संस्था पर्यावरण संतुलन विषयक कायद्याची अंमलबजावणी करते. यामध्ये समाजाचा सहभाग आवश्यक आहे. प्रत्येकाने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. आपण दहा दिवस गणपतीची मनोभावे पूजा करतो. मात्र, त्याच गणेश मूर्तीची विसर्जनानंतरची स्थिती विदारक असते. त्यामुळे “प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीऐवजी साध्या मातीची किंवा शाडू मातीची मूर्ती तयार करणे आवश्यक आहे. मूर्ती तयार करण्याची ही पद्धत केवळ स्वत: पुरती मर्यादित न ठेवता, सर्वांपर्यंत पोहोचवली पाहिजे. यासाठीच गणेशोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी दूत म्हणून काम केले पाहिजे.
– दिलीप खेडकर विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ