विकास आराखडा गदारोळात प्रसिद्ध : नकाशे नागरिकांना उपलब्ध नाही
महाळुंगे इंगळे- गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चेत असलेल्या चाकण नगर परिषदेचा विकास आराखडा प्रचंड मोठ्या गदारोळात सोमवारी (दि. 24) रात्री आठ वाजता प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवार (दि. 25) पासून नागरिकांसाठी नकाशे उपलब्ध होणार होते मात्र, दुपारपरर्यंत ते उपलब्ध झालेले नव्हते, त्यामुळे चाकण नगर परिषद सावळा गोंधळ सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
येत्या एक महिन्यांच्या कालावधीत नागरिकांना सूचना व हरकती घेता येणार असल्याचे नगर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. मात्र, राजपत्रात हा विकास आराखडा प्रसिद्ध झालाच नसल्याची बाब खुद्द नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या समोर मांडली आहे. त्यातच या विकास आराखड्यावर चाकण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
चाकण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष धीरज मुटके, सभापती प्रवीण गोरे, माजी उपनगराध्यक्ष ऍड. प्रकाश गोरे आदींनी याबाबत सांगितले की, यापूर्वीचा विकास आराखडा नागरिकांना त्रासदायक असल्याची बाब समोर आल्याने तत्कालीन विकास आराखडा नागरिकांच्या हिताला बाधा आणणारा असल्याने नाकारला होता. त्याचप्रमाणे नव्याने विकास आराखडा बनवून देण्याची मागणी केली होती. मात्र, चाकणमधील काही राजकीय मंडळींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पुण्यात एक बैठक घेतली. हा विकास आराखडा रद्द होणार नसल्याने स्पष्ट करून पालिकेने आवश्यक ते बदल सुचवून विकास आराखडा प्रसिद्ध करण्याच्या अजित पवार यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानंतर हा विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. नागरिकांना कमीत कमी नुकसान होईल, अशा पद्धतीने आरक्षणे असणारा विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून, नागरिकांना सूचना व हरकती यासाठी पुढील 30 दिवसांचा कालावधी असणार आहे.
- नगररचना अधिकारी आणि पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने हा विकास आराखडा राजपत्रात प्रसिद्ध होणे आवश्यक होते. जे नकाशे प्रसिद्धीसाठी दिले ते राजपत्रात प्रसिद्ध होणे आवश्यक होते. प्रत्यक्षात तसे झालेले नाही. सहाय्यक संचालक नगररचना या अधिकाऱ्यांकडे या बाबी मांडण्यात आलेल्या आहे. याबाबतचा योग्य तो निर्णय नगररचना अधिकारी घेतील.
– डॉ. नीलम पाटील, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद, चाकण. - चाकणकर आक्रमक
चाकणच्या विकास आराखड्यातून अनेक नागरिकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या एकापेक्षा अधिक भूखंडावर वेगवेगळी आरक्षणे पडली असल्याची बाब समोर आली आहे. पालिकेच्या नगरसेवकांनी सुचवलेले सुमारे 90 बदलांना आर्थिक पार्श्वभूमी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एकूणच त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. याबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येणार असल्याचे बाधित शेतकरी बाळासाहेब पठारे, चांगदेव सोरटे, बाळासाहेब गायकवाड, राम गोरे, नवनाथ शेवकरी, निलेश कड, कुमार गोरे, लक्ष्मण वाघ, अनिल देशमुख आदींनी सांगितले.