चाकण : (महाळुंगे इंगळे) गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चेत असलेल्या चाकण नगर परिषदेचा विकास आराखडा प्रचंड मोठ्या गदारोळात सोमवारी (दि. 24) रात्री आठ वाजता प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवार (दि. 25) पासून नागरिकांसाठी नकाशे उपलब्ध होणार होते मात्र, दुपारपरर्यंत ते उपलब्ध झालेले नव्हते, त्यामुळे चाकण नगर परिषदेत सावळा गोंधळ सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, राजपत्रात हा विकास आराखडा प्रसिद्ध झालाच नसल्याची बाब खुद्द नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या समोर मांडली आहे. त्यातच या विकास आराखड्यावर मुख्याधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. चाकण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष धीरज मुटके, सभापती प्रवीण गोरे, माजी उपनगराध्यक्ष ऍड. प्रकाश गोरे यांनी सांगितले की, यापूर्वीचा विकास आराखडा नागरिकांना त्रासदायक असल्याची बाब समोर आल्याने तत्कालीन विकास आराखडा नागरिकांच्या हिताला बाधा आणणारा असल्याने नाकारला होता.
त्याचप्रमाणे नव्याने विकास आराखडा बनवून देण्याची मागणी केली होती. मात्र, चाकणमधील काही राजकीय मंडळींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पुण्यात एक बैठक घेतली. त्यात हा विकास आराखडा रद्द होणार नसल्याने स्पष्ट करून पालिकेने आवश्यक ते बदल सुचवून विकास आराखडा प्रसिद्ध करण्याच्या सूचना अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. त्यानंतर हा विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. नागरिकांना कमीत कमी नुकसान होईल, अशा पद्धतीने आरक्षणे असणारा विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून, नागरिकांना सूचना व हरकती यासाठी पुढील 30 दिवसांचा कालावधी असणार आहे.
चाकणच्या विकास आराखड्यातून अनेक नागरिकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या एकापेक्षा अधिक भूखंडावर वेगवेगळी आरक्षणे पडली असल्याची बाब समोर आली आहे. पालिकेच्या नगरसेवकांनी सुचवलेले सुमारे 90 बदलांना आर्थिक पार्श्वभूमी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एकूणच त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. याबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येणार असल्याचे बाधित शेतकऱ्यांनी सांगितले.