पालिकेकडून स्वच्छता नाही; जलपर्णी तसेच सांडपाण्यामुळे पाणी दूषित
– धिरेंद्र गायकवाड
कात्रज – कात्रज परिसरामध्ये राष्ट्रीय दर्जाचे स्व. राजीव गांधी प्राणीसंग्रहालय व संशोधन केंद्र जवळपास 130 एकर विस्तीर्ण जागेमध्ये तयार करण्यात आले आहे. याठिकाणी देशभरातून लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात. येथील प्राणिसंग्रहालयाच्या मध्यभागी 29 एकर क्षेत्रात तलाव आहे. एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने हा तलाव सांडपाण्याचे डबके झाले असून संपूर्ण तलावाचे पात्र जलपर्णीने झाकले गेले आहे. यातून तलावातील मासे तसेच अन्य जलचर प्राणी मृत पावत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटत आहे.
वातावरणात बदल झाल्याने तलावावर येणाऱ्या विविध पक्ष्यांचे प्रमाणही कमी झाले आहे, अशा स्थितीतही पुण्याचे भूषण असलेल्या कात्रज तलावाकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष आहे.
पुणे शहरातील प्रमुख स्थळांपैकी कात्रज तलावाचा उल्लेख होतो. एकेकाळी या तलावाचे पाणी पिण्यासाठीही वापरले जात होते. त्यानंतरच्या काळात पर्यटन केंद्र म्हणून तलाव परिसर विकसीत करण्यात आला. परंतु, याच्या देखभालीकडे पालिकेकडून कमालीचे दुर्लक्ष होत गेल्याने गेल्या काही वर्षांत या तलावाचे अक्षरश: सांडपाण्याचे डबके झाले आहे. तलावाच्या विस्तीर्ण पात्रावर जलपर्णीचे आच्छादन आहे.
महापालिकेकडून तलावातील जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी लाखोंचा निधी खर्च केला जातो. तरीही तलावातील जलपर्णी कमी होत नाही. कारण, वरील भागातून येणाऱ्या गावांतील सांडपाणी तलावातील पाण्यात मोठ्या प्रमाणात मिसळत आहे.
तलावाच्या दक्षिणेकडील बाजूस ऐतिहासिक नानासाहेब पेशवे तलाव आहे. यामध्ये देखील जलपर्णीचे साम्राज्य होते. मात्र, गेल्यावर्षी तलावातील जलपर्णी काढून तलाव स्वच्छ करण्यात आला, त्या प्रकारे राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील तलावातील जलपर्णी काढण्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
तलावाच्या स्वच्छतेअभावी कात्रज परिसरातील धनकवडी, बालाजीनगर, लेक टाऊन, राजस सोसायटी यासह तलावालगतच्या रहिवासी भागांतील नागरिक डास व कीटकांमुळे त्रस्त आहेत. तसेच, येणाऱ्या पर्यटकांतूनही याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तलावातील जलपर्णी काढून तलाव स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक, पर्यटकांतून होत आहे.
पर्यटकांची पाठ…
कात्रज तलावांमध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी बोटिंग सुरू होते. त्यातून महानगरपालिकेला उत्पन्न देखील सुरू होते. यातून तलावाच्या देखभालीचा खर्च निघत होता. मात्र, बोटिंग बंद (मगर सापडल्याने झाल्यापासून या तलावांकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. सुट्ट्यांच्या कालावधीत प्राणी संग्रहालयामध्ये पर्यटकांची गर्दी वाढते. मात्र, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे पर्यटक कात्रज तालवाकडे पाठ फिरवू लागले आहेत.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथील तलावामधील जलपर्णी काढण्यासाठी जास्त प्रमाणावर मनुष्यबळ व मशिनरी लागणार आहे. त्याकरिता निविदा दिलेली आहे. यामध्ये स्पायडर क्रेन व बोट यांची मागणी केलेली आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर जलपर्णी काढण्याचे काम वेगाने सुरू होईल.
– राजेंद्र शिपकर, प्रभारी कार्यकारी अभियंता, मोटार वाहन विभाग, पुणे मनपा